ताकद पुरवू; पण कामे गतीने करा
पालकमंत्र्यांची प्रशासनाला सूचना : विरोधात उभा राहण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ : आता निवडणुका संपल्या. पुढील चार वर्षे कोणतीही अडचण नाही. आम्ही लागणारा निधी आणि ताकद पुरवायला तयार आहोत; परंतु निधी वेळेत १०० टक्के खर्च झाला पाहिजे. तुम्ही पटापट कामे केली नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी ऐवजी जिल्ह्यातील नागरिक म्हणून तुमच्या विरोधात उभे राहू, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या जिल्हा नियोजन समिती सभेच्या समारोपाला पालकमंत्री राणे यांनी भाषण केले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, डॉ. मोहन दहिकर, आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे, ज्ञानेश्वर म्हात्रे, मिलिश शर्मा, शुभांगी साठे, यशवंत बुधावले उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘पुढील चार महिन्यांत काही किरकोळ निवडणुका वगळता कोणतीही मोठी निवडणूक नाही. त्यामुळे विकासकामे करायला कोणतीही अडचण येणार नाही. आचारसंहितेमुळे आम्हालाही लक्ष देता आले नाही, परंतु आता विकासकामे करणाऱ्या शासकीय यंत्रणेजवळ पाहायला वेळच वेळ आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात निधी आला आहे, परंतु कामे सुरू झालेली नाहीत, अशी स्थिती आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही विकासाला प्राधान्य देणारे आहोत. अशाप्रकारे कामे संथगतीने चालणार नाहीत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजन सभागृहाला हुशार आणि अनुभवी सदस्य लाभले आहेत. मुख्यमंत्री म्हणून काम केलेले खासदार नारायण राणे, कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले दीपक केसरकर आणि खासदार म्हणून काम केलेले आमदार नीलेश राणे या सभागृहात आहेत. यावर्षी आपण जिल्हा नियोजनाचा प्रताप आराखडा ६०० कोटींवर नेला आहे. खासदार राणे यांचे म्हणणे आहे की, जिल्ह्याचा वार्षिक आराखडा एक हजार कोटींचा व्हावा. तसेच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाख व्हावे. यासाठी आम्ही सभागृहातील सर्वच लोकप्रतिनिधी सकारात्मक आहोत.’’
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती विकासाला पोषक आहे. केंद्र आणि राज्यात आमची सत्ता आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने आम्हालाच साथ दिली आहे. त्यामुळे एवढे पोषक वातावरण कधीही मिळणार नाही. याचा फायदा विकासाच्या माध्यमातून जनतेला झाला पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यात आडकाठी ठरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असाही इशाराही मंत्री राणे यांनी यावेळी दिला.
चौकट
जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न
एका बाजूला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत असताना आम्ही जिल्ह्यात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे जिल्ह्यासाठी साडेचार हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार करून आले आहेत. जिल्ह्यात उद्योजक यावेत, त्यांनी गुंतवणूक करावी, यासाठी आम्ही ‘रेड कार्पेट’ घालत आहोत. वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल सुरू होत आहे. चिपी येथील विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झाली आहे. येथून जास्तीत जास्त विमानांची उड्डाणे व्हावीत, यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्याला यश येताना दिसत आहे. मुंबई येथील भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलवाहतूक २१ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. अशाप्रकारे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले.
चौकट
‘सिंधुरत्न समृद्ध’मधून १०० कोटी देण्याचा ठराव
आमदार नीलेश राणे यांनी, आपल्या जिल्ह्यासाठी असलेली सिंधुरत्न समृद्ध विकास योजना शासनाने बंद केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने आमदार केसरकर यांनी चांगले काम केले आहे. ती योजना राज्याने पुन्हा सुरू करावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेत १०० कोटींची तरतूद करण्यात यावी, असा ठराव जिल्हा नियोजन समिती सभेत मांडला. त्याला आमदार म्हात्रे यांनी अनुमोदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.