पोफळीतील बोगद्याची गळती दुरुस्ती युद्धपातळीवर
कोयना टप्पा १, २ मधून बुधवारनंतर वीजनिर्मिती; पाणीटंचाई होणार कमी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता.१४ ः कोयना प्रकल्पाच्या पोफळीतील बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनमधून वीजनिर्मिती सुरू होईल. त्यानंतर पोफळी परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.
कोयनेसह महाराष्ट्रात गतवर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सद्यःस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे; मात्र त्यानंतरही मागील आठ महिन्यांत वीजनिर्मिती कमी झाली आहे. कारण, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी येथील टप्पा १ आणि २च्या आपत्कालीन बोगद्याला व सर्जटँकला गळती लागली आहे. ती दुरुस्त करण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून दोन टप्पे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या एकूण वीजनिर्मितीच्या उत्पादनात ६०० मेगावॅट वीजनिर्मिती तात्पुरती बंद झाली आहे. पोफळी ईव्हीटी इथून पोफळी गाव, पोफळी महानिर्मिती कर्मचारी वसाहत, शिरगाव, तळसर मुंडे आणि कोंडफणसवणे गावासाठी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे.
----
चौकट
तीन महिने कमी दाबाने पाणीपुरवठा
ईव्हीटीमध्ये पाणी नसल्यामुळे या गावात मागील तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, असे पत्र जलसंपदा विभागाने ग्रामपंचायतींना सहा महिन्यापूर्वी दिले होते; परंतु तातडीने उपाययोजना करणे शक्य नसल्यामुळे अखेर ती जबाबदारी जलसंपदा विभागावर आली. तरीही या गावांना तीन महिने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. पोफळीतील बोगद्याची गळती काढण्याचे काम १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर हे काम बंद होऊन झालेल्या कामाचा आढावा घेतला जाईल.
..........
कोट
पोफळीतील बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती सुरू होऊन वीजनिर्मितीतील तूट भरून काढली जाईल आणि ग्रॅव्हिटीवर अवलंबून असलेल्या गावांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल.
- संजय चोपडे, मुख्य अभियंता महानिर्मिती कंपनी पोफळी