25149
भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा विजय
प्रभाकर सावंत ः ‘पार्लमेंट टू पंचायत’ नारा खरा सत्यात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मिळवलेला विजय हा भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि परिश्रमाचा विजय आहे. ‘पार्लमेंट टू पंचायत’ हा भाजपचा नारा आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरला असून विरोधकांना जिल्ह्यात आता कुठेही स्थान उरलेले नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कोळंब येथे केले.
तालुका भाजपच्यावतीने कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात भाजपचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्या सत्कार समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, बबलू राऊत, महेंद्र चव्हाण, शिल्पा खोत, माधुरी मसुरकर, महेश मांजरेकर, जीवन भोगावकर, विजय निकम आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकजुटीने काम केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे तालुक्यात १०० टक्के यश मिळवू शकलो. राज्यात आपली सत्ता आहे, पालकमंत्री आपले आहेत. येणाऱ्या ४ वर्षांच्या काळात खासदार, पालकमंत्री, आमदार यांच्या माध्यमातून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू.’’
श्री. चिंदरकर यांनी, तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशाचे खरे शिल्पकार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः उमेदवार असल्याच्या भावनेतून संघर्ष केला, म्हणूनच आज हे यश मिळाले आहे, असे सांगितले. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या मर्यादित निधीवर विसंबून न राहता, केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांचा अभ्यास करा. या योजना तळागाळातील सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य आत्मसात करा, असे आवाहन केले. शिल्पा खोत यांनीही विचार मांडले. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या समारंभास तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.