25458
सहा महिन्यांपासून रेलिंग
तुटल्याने दुर्घटनेचा धोका
आजगावातील प्रकाराकडे यंत्रणेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १८ ः आजगाव येथील सुरक्षेसाठी बसविलेले लोखंडी रेलिंग तुटून सहा महिने झाले तरी त्याची दुरुस्ती अद्याप झाली नाही. यामुळे अपघाताचा धोका कायम आहे.
मळेवाड ते आजगाव मुख्य रस्त्यावरील आजगाव वाघबिळ येथील रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता. या रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी खोल दरी असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळण असल्याने येथे प्रवास करताना, वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दरीच्या बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग करण्यात आले होते; मात्र ते सद्यस्थितीत नादुरस्त आहेत. सहा महिन्यांपूर्वी येथे झालेल्या अपघातात या रेलिंगमुळे कोणाला दुखापत झाली नाही; मात्र हे लोखंडी रेलिंग तुटल्याने तेथे मोठी दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने त्या ठिकाणी प्लास्टिक रिबन लावून ठेवली होती; मात्र सहा महिने उलटूनही अजूनही रेलिंगची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याआधी संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक करत आहेत.