आरवली रेल्वे स्थानकात
पाय घसरून महिला जखमी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः आरवली रोड रेल्वे स्थानकात बांधलेल्या स्वच्छतागृहासाठी शोषखड्डा (स्वच्छतागृह टाकी) नसल्यामुळे उघड्यावरच मलमूत्र सोडण्यात येत असल्याने गेले वर्षभर स्थानकातील दुर्गंधीचा व डासांशी सामना प्रवाशांना करावा लागत आहे. गेले दोन महिने स्वच्छतागृहातील पाइप चोंदल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याने स्वच्छतागृह तुडुंब भरून ते पाणी प्लॅटफॉर्मवर वाहत आहे. संयुक्ता संजय जड्यार (रा.खेरशेत) या आरवली रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सांडपाण्यावरून पाय घसरून पडल्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळतच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर धनावडे, दत्ताराम लांबे, मुरुडवचे माजी सरपंच मुकेश राजाराम चव्हाण, मुरडव,आरवली व कोंडीवरेचे पोलिस पाटील राजेंद्र सखाराम मेणे, दशरथ पवार, सुनील भुवड आदींनी आरवली रोड रेल्वे स्थानकात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्वच्छतागृह दुरुस्त करावे, जखमी झालेल्या जड्यार यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने तेथील अधिकाऱ्यांकडे केली.
-----
प्रवाशांची गैरसोय
आरवली रोड रेल्वे स्थानकाच्या रत्नागिरीला जातानच्या डाव्या बाजूस प्लॅटफॉर्म नंबर २ नसल्यामुळे प्रवाशांचे अनेक वर्ष प्रचंड हाल होत आहेत. येथे नवीन प्लॅटफॉर्म बांधावा, पर्यायी शंभर मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून रस्त्यावर पथदीपांची व्यवस्था करावी, स्थानकात प्रतीक्षालय उभारावे, या मागण्यांसाठी क्षेत्रीय प्रबंधकांची रत्नागिरी येथे भेट घेणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी सांगितले.