रत्नागिरीतील ‘त्या’ रस्त्यांची उच्चस्तरीय पाहणी
प्रगतीचा घेतला आढावा; ३०० कोटींचा खर्च, काही ठिकाणी दुरुस्तीची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता २८ ः रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या चार प्रमुख रस्तेप्रकल्पांची नुकतीच उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली. हे रस्ते पूर्ण होऊन तीन वर्षे झाली असून, या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरात नेमका काय बदल झाला, याचा सखोल आढावा या दौऱ्यात घेण्यात आला.
उच्चस्तरीय समितीने केलेल्या पाहणीत चाफे ते गणपतीपुळे, हातिवले ते जैतापूर, दाभोळ ते वाटूळ, देवरूख ते तुरळ यांचा समावेश आहे. हे चारही रस्ते कोकणातील किनारी भाग, डोंगराळ पट्टा आणि ग्रामीण भागांना थेट पर्यटनस्थळे, औद्योगिक क्षेत्रे आणि मुख्य बाजारपेठांशी जोडतात. पाहणीदरम्यान महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. डोंगराळ भागातील नागमोडी रस्त्यांच्या सुधारणेमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झाला असल्याचे स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी रस्त्यांची जाडी, डांबरीकरणाचा दर्जा, साईड ड्रेनेज, रिटेनिंग वॉल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची बारकाईने पडताळणी केली. काही ठिकाणी किरकोळ त्रुटी आणि दुरूस्तीची गरज असल्याचे आढळले असून, त्याबाबत संबंधित विभागाला तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पाहणी दौऱ्यात मीनाक्षी शर्मा, शिवा दाडेला, अनिता कुमारी, मारिया लहुरीन, मारिया एरिस मर्डनिया व डिकवाला या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपअभियंता भारती जनक धोत्रेकर आणि संबंधित शाखा अभियंता उपस्थित होते.
----
चौकट
भविष्यातील प्रकल्पांसाठी मार्गदर्शक
पाहणीचा सविस्तर अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे. तीन वर्षांनंतरच्या या रस्तेस्थितीचा अहवाल भविष्यातील प्रकल्पांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या रस्त्यांमुळे जिल्ह्याची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होऊन आर्थिक हालचालींना मोठी चालना मिळाल्याचे प्राथमिक निरीक्षणात स्पष्ट झाले आहे.
----
----