rat4p7.jpg-
28513
रत्नागिरी - वस्डम पार्क बी. विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी पिंपरी-पुणे या संस्थेने केलेल्या ‘एकेक पान गळावया’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
स्मृतिभ्रंशाच्या गर्तेतील नात्यांचा
प्रवास ः ‘एकेक पान गळावया’
पिंपरीतील सोसायटीचे सादरीकरण; अभिनयाला प्रेक्षकांची दाद
इंट्रो
स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) या आजारामुळे व्यक्ती आणि कुटुंबावर होणाऱ्या परिणामांचे संवेदनशील चित्रण लेखक डॉ. समीर मोने यांनी ''एकेक पान गळावया'' या नाटकातून केले आहे. वय वाढत असताना माणूस कसा एकटा पडतो, कुटुंबातील नाती कशी ताणली जातात आणि काळाच्या ओघात आयुष्याची पाने कशी गळत जातात, याचे प्रतिकात्मक दर्शन दिग्दर्शक युसुफअली शेख यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे. हे नाटक वस्डम पिंपरी येथील पार्क बी. विंग हाऊसिंग सोसायटीने सादर केले आहे.
- नरेश पांचाळ, रत्नागिरी
काय आहे नाटक ?
‘एकेक पान गळावया’ हे नाटक अप्पा (विनायक) आणि त्यांच्या कुटुंबाभोवती फिरते. नाटकाची सुरवात अप्पा आणि आत्माराम यांच्या सांगितिक मैफलीने होते. त्यात अचानक अप्पांचा मुलगा अनिरूद्ध येऊन गोंधळ घालतो. येथून पुढे अप्पांच्या भूतकाळाचा प्रवास उलगडतो. अप्पा महावितरणमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी कावेरी यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचे सावट आले. मोठा मुलगा अनिरूद्ध व्यसनाधीन होऊन मृत्यूमुखी पडतो तर त्याची पत्नी व मुलगी घर सोडून जातात. दुसरा मुलगा विश्वंभर परदेशात स्थायिक झाल्याने अप्पा एकटे पडतात. एकटेपणामुळे त्यांना ''डिमेन्शिया'' (स्मृतिभ्रंश) हा आजार जडतो. अप्पांना कावेरीसोबतचे काही प्रसंग आठवतात. तिच्या आजारपणासाठी बनवलेली औषधांची पेटी, तिची काळजी इत्यादी. त्यांच्या विचित्र वागण्यामुळे मदतनीस टिकत नाहीत, हे समजल्यानंतर विश्वंभर परदेशातून परत येऊन डॉक्टर मैत्रीण सुकन्या हिच्या मदतीने त्यांच्यावर उपचाराचा प्रयत्न करतो; पण आजार बरा होण्यासारखा नसल्याचे स्पष्ट होते. शेवटी विश्वंभरला पुन्हा परदेशी जावे लागते. अप्पांना नर्सिंग होममध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला जातो. त्या वेळी अप्पा म्हणतात, ''माझ्या आयुष्याचे एकेक पान आता गळावयाला लागले आहे...'' आणि नाटक समाप्त होते.
कुटुंबव्यवस्थेतील बदल, परदेशी स्थलांतर, वृद्धांची उपेक्षा, मानसिक आजारांविषयीची अनभिज्ञता या सामाजिक वास्तवांना स्पर्श करत हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. वृद्धांच्या भावविश्वातील वेदना आणि असहाय्यता प्रभावीपणे मांडली आहे.
सूत्रधार आणि सहाय्य
नेपथ्य- विनायक परदेशी, प्रकाशयोजना- अभिप्राय कामठे, संगीत संयोजन-श्रावणी गुळेकर, रंगभूषा-कमलेश बिचे, वेशभूषा- श्लोक डाळींबकर, रंगमंच सहाय्य- लक्ष्मी चव्हाण, शबरी कुलकर्णी, गणेश जाधव, सुरज कांबळे,
पात्र परिचय
अप्पा- मनोड डाळींबकर, आत्माराम- चंद्रशेखर कोल्हे, अनिरूद्ध, विश्वंभर,गणपत- सौरभ कुलकर्णी, कावेरी, सुकन्या- पल्लवी परब, श्रद्धा, स्विती, विभावरी, उज्ज्वला-नेहा परांजपे.