rat४p२.jpg-
२६O२८७२२
रत्नागिरी- महावितरण कंपनीमध्ये लाईनमन दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये सहभागी मान्यवर.
----
लाईनमन आता होत आहेत ‘स्मार्ट’
दत्तात्रय पडळकर ः रत्नागिरीत लाईनमन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः ‘ऊन, वारा आणि पाऊस यासारख्या कठीण परिस्थितीवर मात करून लाईनमन अहोरात्र वीजसेवा बजावत असतात. ग्राहकांच्या घरातील प्रकाश कायम ठेवणारा लाईनमन हा खऱ्या अर्थाने महावितरणचा कणा असून, तो आता काळाप्रमाणे ‘स्मार्ट’ होत आहे,’ असे प्रतिपादन महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले.
महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळ कार्यालयात काल (ता. ४) आयोजित लाईनमन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाईनमनचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘विद्युत सुरक्षा शपथ’ घेतली. यावेळी श्री. पडळकर म्हणाले, फयान, निसर्ग आणि तोक्ते यांसारख्या महाभयंकर वादळांतही जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवला आहे. काम करताना लाईनमनने स्वतःच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आता ‘शून्य अपघात’ हे ध्येय समोर ठेवून तंत्रज्ञानाची कास धरावी, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच मार्चअखेरपर्यंत रत्नागिरी परिमंडळ ‘शून्य थकबाकी’ करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केले.
या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, सहाय्यक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजित सिकनिस, जितेंद्र फुलपगारे, हरी ताम्हनकर आणि औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे उपस्थित होते. संदेश चवेकर यांनी प्रास्ताविक केले, तर तृप्ती जोशी यांनी सूत्रसंचालन आणि प्रवीण मोहिते यांनी आभार मानले.