‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने
२५ लाखांची फसवणूक
जयगड-साखर येथील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : वारंवार फोन करून आतंकवादी सहभाग, बॅंक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे, असे खोटे सांगून आणि नाशिक पोलिस असल्याचे भासवून २५ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ सकाळी दहा या कालावधीत तालुक्यातील जयगड-साखरी बौद्धवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१, रा. जयगड, साखरी बौद्धवाडी, रत्नागिरी) यांना अनोळखी तिघांनी वारंवार फोन करून नाशिक पोलिस असल्याचे भासविले. त्यांचा आतंकवादी हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले. तसेच सुधाकर जाधव यांच्या नावे बॅंक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉड्रिंग झाले आहे. त्याबाबत खारघर येथे तक्रार नोंद असल्याचे खोटे सांगून चौकशीसाठी हजर राहावे लागेल. तसेच व्हॉटसअॅप कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट राहावे लागेल. फिर्यादीच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया येथे तपासण्यासाठी जमा करावे लागतील, असे सांगून फसविले. पोलिस ठाण्याचा लोगो असलेले त्यावर फिर्यादीचे नाव, आधार कार्ड क्रमांक व फोटो असलेले बनावट पत्र पाठवून सुधाकर जाधव यांच्याकडून २५ लाख २७ हजार रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर भरणा करण्यास सांगून फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अंमलदार करीत आहेत.