रामनवमी सोहळ्याला आचरा येथे थाटात सुरुवात
विविध कार्यक्रम : देशभरातून भाविक दाखल
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २५ : येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव पारंपरिक संस्थान थाटात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. रामनामाच्या जयघोषाने आचरानगरी दुमदुमली असून, रामजन्माचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईसह देशभरातून भाविक दाखल झाले आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मंदिरासमोर गुढी उभारून या उत्सवाचा प्रारंभ झाला.
प्रथेप्रमाणे, कानविंदे यांच्या वाड्यावरून श्रीरामाची उत्सवमूर्ती वाजतगाजत आणून मंदिरातील नंदीचौकात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या दिवसापासून दररोज दुपारी आणि सायंकाळी रघुपती आरती, प्रदक्षिणा, माखण, दरबारी गायन, पुराण वाचन आणि पालखी सोहळा असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. आचरा संस्थानच्या या उत्सवात दरबारी गायनाची मोठी परंपरा आहे. यंदाही नामांकित कलाकारांची हजेरी लागणार आहे.
या निमित्ताने उद्या (ता. २६) दुपारी रामदासी मिलिंदबुवा कुलकर्णी (सांगली) यांचे रामजन्माचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता गिरीश संझगिरी यांचे सुश्राव्य गायन, शुक्रवारी (ता. २७) सकाळी स्थानिक गायकांचे कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या प्रसिद्ध गायिका निधी घारे यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना सुशील गद्रे (तबला), अभिनव जोशी (पखवाज), गणेश मेस्त्री आणि हर्ष बोंडाळे (तालवाद्य) साथ संगत करतील. शनिवारी (ता. २८) रात्री महापूजेनंतर भजने आणि ललित कार्यक्रम होईल. रविवारी (ता. १) ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अजरामर ''गीत रामायणा''वर आधारित ‘मन हे राम रंगी रंगले’ हा स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.
यंदाच्या उत्सवात दररोज पालखीनंतर रोहन पुराणिक बुवा (परुळे) यांचे सुश्राव्य कीर्तन ललितोत्सवापर्यंत होणार आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी, सचिव संतोष मिराशी आणि देवस्थान समितीच्यावतीने केले आहे.