ratchl२८५.jpg ः
33993
चिपळूण ः आकले येथे करण्यात येणारे जमिनींचे सीमांकन.
आकले येथे कंपनीकडून जमिनीचा ताबा
सहा शेतकऱ्यांची तक्रार; महसूलसह पोलिसांकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः तालुक्यातील आकले येथे एका खासगी कंपनीकडून बेकायदा जमिनीचा ताबा घेतला जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनींची विक्री केलेली नसताही वनविभागाचे नाव सांगून ताबा घेण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आकले येथील सहा शेतकऱ्यांनी महसूलसह पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
तालुक्यातील आकले येथील शेतकऱ्यांनी महसूल व शिरगांव पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, महादेव भिकू गजमल गट नं. ९०१, बारकू गंगाराम वनगे गट क्र. १०२३, जयवंत विठोबा वनगे गट क्र. ९१२, हनुमंत विठोबा जोशी गट क्र. ९८९, ९१६,९८७, दत्ताराम सीताराम गोरखे, गट क्र. १०००, ९८६, ९१०, शंकर सोनू उदेग गट क्र. ९८८ या मिळकतीचे कोणतेही संपादन झालेले नाही. या मिळती पिढ्यानपिढ्या महसूलदप्तरी नोंद आहेत. आमच्या मालकीची कोणतीही जमीन वनविभाग अथवा खासगी कंपनीला दिलेली नाही तसेच कोणास विक्रीदेखील केलेली नाही. जमिन खरेदीसाठी विविध प्रकारचे दस्तावेज लागतात. त्यावर येथील शेकऱ्यांनी सह्यादेखील केलेल्या नाहीत. जमिनींचा सातबारादेखील स्थानिक शेतकऱ्यांच्या नावानेच आहे; मात्र सदरची जमीन वनविभागाने हस्तांतरित केल्याची अफवा पंचक्रोशीत पसरवली जात आहे. यातूनच खासगी कंपनीने स्थानिकास हाताशी धरून जमिनींचे सीमांकन करण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी तिवरे भेंदवाडीमधील काही शेतकऱ्यांनी याच पद्धतीची तक्रार महसूल व पोलिसांकडे केली होती. त्यामुळे बेकायदा ताबा घेणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी आकले येथील सहा शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शासनानेच संबंधित कंपनीची निवड केली आहे. ही कंपनी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करत आहे. पुढील कालावधीत सदरची जमीन शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध करून खरेदी केली जाणार असल्याचे समजते. यास अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.