35882
ओझरममधील रस्ता ४० वर्षांनी खुला
पायपीट थांबली; रस्त्याचे लवकरच खडीकरण
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ : ओझरम गावातील फौजदारवाडी, आनंदवाडी, भंडारवाडीतील रस्ता गेली ४० वर्षे बंद आहे. हा भाग दुर्गम व जंगली भागात येत असून रस्ता बंद असल्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्धांना पायपीट करावी लागत होती. अखेर ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन सरपंच समृद्धी राणे, उपसरपंच प्रशांत राणे व इतर लोकप्रतिधींनी ग्रामस्थांशी संवाद साधून जेसीबीच्या सहाय्याने दगड व माती हटवून दोन्ही रस्ते खुले केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य सहदेव खाडये, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी सभापती विनायक राणे, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी संगीता पाटील, ओझरम तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबू राणे, पोलिसपाटील तुषार तांबे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप तांबे, कासार्डे तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर आदी उपस्थित होते.
रस्ते बंद असल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांनी इशारा देत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार २९ जानेवारीला सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर नागरिकांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला होता. रस्त्याची समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. दरम्यान, रस्ता खुला करण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने रविवारी (ता. ५) ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर दोन्ही रस्ते खुले करण्यात आले. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच या रस्त्यांचे खडीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.