-rat९p२.jpg -
P26O36250
चिपळूण : देसाई मोहल्ला परिसरात अशी नाल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.
----------
चिपळुणात पूरनियंत्रणासाठी नालेसफाईला वेग
पावसाळ्यापूर्वीची तयारी; पालिकेचे विविध भागात काम सुरू, नागरिकांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः पावसाळ्यात शहरात उद्भवणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठी चिपळूण नगरपालिकेकडून नालेसफाईच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे ३५ टक्के गटारांची स्वच्छता पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १५ मे पूर्वी पूर्ण केली जातील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांनी दिली.
चिपळूण शहराने २१ जुलै २०२१ रोजी महापूराचा भीषण फटका अनुभवला होता. भविष्यात तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी पालिका प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करणे बंधनकारक असताना, पालिकेने १५ मे ची डेडलाईन निश्चित केली आहे. सध्या शहरातील भोगाळे, खाटीक आळी, मार्कंडी, वडनाका, पानगल्ली, भेंडीनाका, अर्बन बँक परिसर आणि गांधीचौक अशा विविध भागांत नालेसफाई व गटार स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे.
शहरातील नाल्यांची झालेली अरुंद अवस्था आणि गाळाने भरलेली गटारे हे पूरपरिस्थितीचे प्रमुख कारण मानले जाते. पालिका प्रशासनाकडून नवीन इमारतींना परवानगी देताना सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डा (सोक पिट) आणि नाले काढण्याची सक्ती केली जाते; मात्र, इमारत पूर्ण झाल्यानंतर नियमांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची खातरजमा करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक इमारतींच्या परिसरात आजही सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी थेट रस्त्यांवर आणि गटारांत येते.
----
नागरिकांच्या अपेक्षा
दरवर्षी नालेसफाई केली जात असली, तरी प्रत्यक्षात ही कामे अर्धवट राहत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांकडून केली जाते. त्यामुळे यंदाची नालेसफाई केवळ कागदावर न राहता पावसाळ्यापूर्वी ती पूर्णक्षमतेने आणि गुणवत्तेसह व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
-----
कोट
चिपळूण पालिकेकडे १३० सफाई कामगार आहेत. पालिकेचा जेसीबी आहे तसेच कचरा वाहतुकीच्या गाड्या उपलब्ध आहेत. उपलब्ध सामग्रीचा वापर करून शहरातील नाले, गटार, पऱ्हे सफाई सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई शंभर टक्के केली जाईल. शहरातील नाले-पऱ्हे स्वच्छ केले जातील. ज्या भागात गटारे तुंबली आहेत त्या भागातील नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधल्यास आम्ही तत्काळ नागरिकांची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.
- वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक