36500
अधिकारी बनल्यानंतरही जपली सामाजिक बांधिलकी
क्षयरुग्णांचे पालकत्व; ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियानांतर्गत पाऊल
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रशासकीय यशच प्राप्त केले नाही, तर समाजाप्रती आपली संवेदनशीलताही जपली आहे. या अभ्यासिकेतून विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या ८ माजी विद्यार्थ्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. या अधिकाऱ्यांनी समजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
यशाचा आनंद सामाजिक कार्यातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून विविध जिल्ह्यांत उच्च पदांवर रुजू झालेल्या या विद्यार्थ्यांनी ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियानांतर्गत एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. आपल्या पहिल्या काही वेतनांतून समाजातील दुर्लक्षित क्षयरुग्णांना आधार देण्यासाठी या सर्वांनी प्रत्येकी एका रुग्णाला दत्तक घेतले आहे. जिल्हा क्षयरोग केंद्र, सिंधुदुर्ग येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. ‘निक्षय मित्र’ असे : तृप्ती टेमकर (सहाय्यक संचालक, जिल्हा कोषागार, चंद्रपूर), एकादशी कोंबे (जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग), सागर शिरसाट (कृषी विभाग, सिंधुदुर्ग), आदेश घाडी (जिल्हा पुरवठा विभाग, सिंधुदुर्ग), किरण गोसावी (जिल्हा कोषागार विभाग, सिंधुदुर्ग), सचिन जधर (वित्त विभाग, कोल्हापूर), नितेश पाताडे (कृषी सहाय्यक, मालवण), प्रथमेश केरकर (जीएसटी विभाग, मुंबई). पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत, हे निक्षय मित्र दत्तक घेतलेल्या रुग्णांना दरमहा ‘न्यूट्रिशनल कीट’ (पोषण आहार) पुरवणार आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी गरिबी, संघर्ष आणि अपयशाचा सामना करतात. मात्र, जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या शिस्तीत तयार झालेल्या या विद्यार्थ्यांनी पद मिळाल्यानंतर समाजाला विसरले नाहीत. सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्या पहिल्या काही पगारांतून समाजातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षयरुग्णांना आधार देण्याचा त्यांचा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे.
---------------
प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक
क्षयरुग्णांना औषधांसोबतच प्रथिनांची मोठी गरज असते, जी या मदतीतून पूर्ण होणार आहे. डॉ. सुधीर धनगे आणि सांख्यिकी अधिकारी निकेत जाधव यांनी या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचा गौरव केला. अभ्यासिकेच्या संस्कारांचे हे फळ असून, पद मिळाल्यावरही आपल्या जिल्ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही बाब इतर तरुणांसाठी प्रेरणादायी हे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
---------
रुग्णांना मानसिक आधाराची गरज
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी सांगितले की, भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत, तर रुग्णांना सकस आहाराची आणि समाजाच्या मानसिक आधाराची गरज आहे. अभ्यासिकेतील या विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार इतर तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.