चिपळूण-पुणे एसटी वाहतूक
ताम्हिणी मार्गे सुरू करा
नित्यानंद भागवत ; प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल
चिपळूण, ता. १९ ः चिपळूण ते पुणे मार्गावरील एसटी वाहतूक माणगाव-ताम्हिणी घाट मार्गे आणि कोल्हापूर-बेळगाव मार्गावरील वाहतूक साखरपा-आंबा घाट मार्गे वळवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पाटण येथील रस्ते कामामुळे बस फेऱ्यांना मोठा वळसा घालावा लागतो. त्यात वेळ आणि पैसा वाया जातो. त्यासाठी प्रशासनाने हा बदल करावा, असे नित्यानंद भागवत यांनी सांगितले.
पाटण शहरातील रस्त्याच्या कामामुळे सध्या कराड-उंब्रज मार्गे जाणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने १० ते १२ किमीचा वळसा घालून सुरू आहे. सातारा, बीड, सांगली यांसारख्या शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांना सध्या दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र, पुणे, शिर्डी आणि संभाजीनगरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी ताम्हिणी घाट हा उत्तम आणि कमी अंतराचा पर्याय आहे. भाडेवाढीतून सुटका करण्याची गरज सध्या गर्दीचा हंगाम असल्याने एसटी प्रशासनाने १५ टक्के भाडेवाढ लागू केली आहे. त्यातच वळसा मारून जाणाऱ्या अंतराचे जादा भाडे आकारले जात असल्याने पुणे ''लालपरी''च्या तिकीटात तब्बल ६५ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाहतूक ताम्हिणी आणि आंबा घाट मार्गे वळवली, तर प्रवाशांचा प्रवास खर्च कमी होईल आणि वेळेत मोठी बचत होईल. तसेच एसटी महामंडळाच्या इंधनाची बचत होईल, असा पर्याय श्री. भागवत यांनी सुचवला आहे.