आईच्या मायेने घडवला ‘आस्था’चा दीपस्तंभ
सुरेखा पाथरे यांची प्रेरणादायी कहाणी; दिव्यांग मुलांना आधार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : आई हे जगातील सर्वात संवेदनशील आणि सामर्थ्यशाली रूप मानले जाते. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी झटणाऱ्या आईचे जिवंत उदाहरण म्हणजे रत्नागिरीतील सुरेखा देवराव पाथरे. मुलगा आल्हाद याला ऑटीझम असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांनी खचून न जाता त्याच आव्हानाला जीवनध्येय बनवले आणि ‘आस्था सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून हजारो दिव्यांग मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला.
जिल्हा परिषदेत शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या पाथरे यांनी मुलाच्या आजारानंतर मोठा निर्णय घेतला. २३ ऑक्टोबर २००८ रोजी त्यांनी नोकरीचा राजीनामा देत ‘आस्था सोशल फाउंडेशन’ची स्थापना केली. त्यानंतर दिव्यांग क्षेत्रातील बारकावे समजून घेण्यासाठी त्यांनी आवश्यक शिक्षणही पूर्ण केले आणि गेल्या १८ वर्षांपासून त्या या क्षेत्रात निष्ठेने कार्यरत आहेत. आज आस्था ही केवळ संस्था नसून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे सक्षम व्यासपीठ बनले आहे. लहान वयात अपंगत्वाचे निदान, विशेष मुलांसाठी उपचार, स्वावलंबी शिक्षण, समुपदेशन, सांस्कृतिक विकास, कायदेशीर मार्गदर्शन, रोजगारासाठी मदत, सहाय्यभूत साधनांची उपलब्धता, समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न तसेच ग्रामीण भागात फिरत्या केंद्राद्वारे श्रवण चाचणी अशा विविध उपक्रमांद्वारे संस्था कार्यरत आहे.
या कार्याचा विस्तार होत आज ही संस्था जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणूनही ओळखली जाते. स्वतःच्या दुःखाचे रूपांतर समाजसेवेच्या शक्तीत करण्याचा आदर्श सुरेखा पाथरे यांनी घालून दिला आहे. रत्नागिरीतील सुमंत कॉम्प्लेक्समधून सुरू झालेला आस्थाचा प्रवास आज कोकणातील अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे. एका मुलाच्या ऑटीझमपासून सुरू झालेली ही वाटचाल आज हजारो दिव्यांगांच्या जीवनात आल्हाद निर्माण करत आहे.
----
विविध समित्यांवर काम
आमराई, स्पर्श, युनिसेफ, यशदा, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांसारख्या संस्थांसाठी मास्टर सोशल ट्रेनर म्हणून सुरेखा पाथरे यांनी काम केले आहे. तसेच विविध जिल्हास्तरीय समित्यांवर त्या सक्रिय सदस्य म्हणून प्रशासनाला मोलाचे सहकार्य करत आहेत.