ग्रामीण जीवन---------लोगो
इंट्रो
सण-उत्सव, वाढदिवस, जयंती-पुण्यतिथी ते अगदी लग्नसमारंभाच्या निमंत्रणांपर्यंत सर्वकाही आता सोशल मीडियाच्या एका क्लिकवर आले आहे. मोबाईलवरील आकर्षक इमेजेस आणि संदेशांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असला, तरी माणसांमधील थेट संवाद दुरावत चालला आहे. याचे विपरीत परिणाम समाजमनावर होत असून, मानवी नात्यांमधील ऊब कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
- सचिन यादव, संगमेश्वर
------
''प्रत्यक्ष'' संवाद हरवतोय
आधुनिक तंत्रज्ञानामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप यासारख्या माध्यमांवर शुभेच्छांचा अक्षरशः पूर येतो. सणासुदीच्या दिवशी हजारो संदेश मोबाईलवर धडकतात. मात्र, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची परंपरा हळूहळू लोप पावत चालली आहे. पूर्वी आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाची वेळ, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकमेकांना भेटून संवाद साधत असत. त्या भेटीतून नात्यांमधील जवळीक वाढण्यास मदत होत असे. आता मात्र, केवळ ''फॉरवर्डेड'' मेसेज पाठवून कर्तव्य पूर्ण केल्याची भावना निर्माण होत आहे. याबाबत राकेश लाड यांनी सांगितले, ‘‘सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे शहरांमधील नात्यांमधील ओलावा हरवत चालला आहे. ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात परंपरा टिकून आहे, मात्र तीदेखील आता धोक्यात आली आहे.’’ तर शुभम बसवणकर यांचे मत आहे की, ‘‘व्यस्त जीवनशैलीत सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य झाला असला, तरी त्याचा अतिरेक घातक ठरत आहे. त्याचे फायदे जितके आहेत, तितकेच तोटेही आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांनी यावर स्वतःहून नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.’’
पूर्वी प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे नात्यांमध्ये एक वेगळी जवळीक निर्माण होत होती. आता फक्त मोबाईलवरून संदेश पाठवून औपचारिकता पूर्ण केली जाते. यामुळे आपली मूळ संस्कृतीच हरवत चालली आहे की काय, अशी भीती वाटते, असे चेतन यादव यांनी सांगितले. सोशल मीडियामुळे संवाद सुलभ झाला असला, तरी त्याचा अतिरेक मानवी नात्यांतील ओलावा कमी करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना प्रत्यक्ष संवादाची आणि भेटीगाठींची परंपरा जपली गेली पाहिजे, अशी भावना आता सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.