- rat२६p१६.jpg-
26O39852
रत्नागिरी ः फेरीवाल्यांना प्रतीक्षा ग्राहकांची.
----
मांडवी किनारी पर्यटकांचा ओघ घटला
विक्रेंत्यांना प्रतीक्षा ; मे महिन्यात गर्दी होण्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः रत्नागिरीचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध मांडवी समुद्रकिनाऱ्यावर (गेटवे ऑफ रत्नागिरी) यंदा सुटीचा कालावधी सुरु होऊनही अपेक्षेप्रमाणे पर्यटक आलेले नाहीत. शाळांना सुट्या चालू झाल्यामुळे मांडवी किनारा पर्यटकांनी गजबजून जाईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांची होती. परंतु, सध्या तसे चित्र नाही. त्यामुळे याचा थेट परिणाम स्थानिक विक्रेत्यांच्या उत्पन्नावर झालेला आहे.
नेहमीच्या तुलनेत यंदा बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. सध्या किनाऱ्यावर दिसणारी गर्दी ही मुख्यत्वे स्थानिकांचीच आहे. संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत काही प्रमाणात गर्दी होत असली तरी, एरवी पर्यटकांनी फुलून जाणारे हे पर्यटन स्थळ यंदा शांत दिसत आहे. स्थानिक विक्रेत्यांशी संवाद साधला असता, पर्यटनाची ही मंदी जागतिक आणि आर्थिक कारणांशी जोडलेली असल्याचे समोर आले आहे. ‘जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन तसेच गॅस उपलब्धतेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे अनेक कुटुंबे लांबचा प्रवास टाळत आहेत,’ असे मत येथील विक्रेत्यानी व्यक्त केले. या अनिश्चिततेमुळे पर्यटकांनी बाहेर पडण्याकडे पाठ फिरवली आहे. सुटीच्या हंगामात होणाऱ्या कमाईवरच येथील अनेक विक्रेत्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, मुख्य हंगामातच पर्यटकांची संख्या घटल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आगामी काळात ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा आता स्थानिक विक्रेते व्यक्त करत आहेत.
---
कोट
परीक्षांचे निकाल १ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातून फिरण्यासाठी येणारे किंवा चाकरमानीही अजून गावी आलेले नाहीत. त्यामुळे मांडवी पर्यटकांची अपेक्षित गर्दी नाही. सध्या स्थानिक नागरिक सायंकाळी फिरण्यासाठी येत आहेत. त्यावरच किनाऱ्यावरील स्टॉलधारकांची उलाढाल होत आहे. मे महिन्यात चांगल्याप्रकारे पर्यटक येतील अशी अपेक्षा आहे.
- सुनील शिवलकर, मांडवी