- rat११p१०.jpg-
26O42822
ग्रामीण भागात मैदानी खेळ खेळणारी मुले.
ग्रामीण बालपणाचा गंध कायम
जुने खेळ आजही सरस ; विटी-दांडू, लगोरीला मुलांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : उन्हाळी सुटीत पूर्वी घराघरांत गावाला जाण्याची लगबग होत होती. चिंच-बोरं, विटी-दांडू आणि सायंकाळी रंगणारा लगोरीचा खेळ, अशी मेजवानी असे. आजच्या आधुनिक काळात शहरी मुले मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेली दिसत आहेत. ग्रामीण भागातील चित्र मात्र अजूनही आश्वासक आहे. काळ बदलला तरी गावच्या मातीतील खेळांचा गंध आणि उत्साह आजही टिकून आहे.
एकेकाळी उन्हाळ्याच्या सुटीत बैलगाडीतून केलेली रपेट किंवा घोडागाडीची सफर हे मुलांचे मुख्य आकर्षण असायचे. आज आधुनिकतेमुळे वाहने बदलली असली तरी ग्रामीण भागातील मुले आजही विटी-दांडू, आट्यापाट्या आणि लगोरीसारख्या खेळांना विसरलेली नाहीत. दुपारच्या कडक उन्हात झाडाच्या सावलीत खेळले जाणारे हे खेळ मुलांमधील संघभावना आणि जिद्द वाढवताना दिसत आहेत. गावच्या बालपणात केवळ जुनेच खेळ नाहीत तर आता आधुनिक खेळांचीही भर पडली आहे. गावागावात आता क्रिकेटच्या जोडीला व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि फुटबॉलसारखे खेळही खेळले जात आहेत. मोबाईल गेमिंगच्या विळख्यात न अडकता ग्रामीण भागातील मुले मैदानी खेळांकडे वळत आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे. यामुळेच ‘ग्रामीण भागातील बालपण आजही मातीत टिकून आहे,’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकूणच काय तर तंत्रज्ञानाच्या आक्रमणातही गावच्या मातीने आपले बालपण जपून ठेवले आहे. मोबाईलच्या ‘व्हर्च्युअल’ जगापेक्षा मैदानातील ‘रिअल’ खेळच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम ठरत आहेत.
---
कोट
शहरी भागात मुले तासनतास मोबाईलसमोर बसून असतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्या तुलनेत ग्रामीण भागातील मुले आजही मैदानावर घाम गाळत आहेत. हेच खरे सुदृढ बालपण आहे.
- परेश खोपडे, शिक्षक