- rat१४p२.jpg-
26O43343
रत्नागिरी ः चांदेराई-कुरतडे मार्गावरील दरडग्रस्त भागांची पाहणी करताना युवासेनेचा पदाधिकारी.
‘चांदेराई-कुरतडे’वर दरडींचा धोका
युवासेनेकडून पाहणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे या मुख्य मार्गावरील दरड प्रवण क्षेत्रांची स्थिती भयावह झाली असून पावसाळ्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
चांदेराई, कुरतडे आणि मिरजोळे भागातील दरड प्रवण भागांची युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी बाधित परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. चांदेराई-कुरतडे या मुख्य रस्त्यावरील डोंगराचे भाग खचले असून स्थिती चिंताजनक आहे. पावसाळ्यापूर्वी येथे तातडीने उपाययोजना न केल्यास वाहतूक ठप्प होऊन मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरजोळे येथील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतजमिनी खचून मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नाही. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने प्रशासनाने चांदेराई-कुरतडे मार्गाची तांत्रिक पाहणी करून तिथे संरक्षक भिंती उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी प्रसाद सावंत यांनी केली आहे. तसेच मिरजोळेतील बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे. ‘प्रशासनाने यावर त्वरित पावले न उचलल्यास जनसामान्यांच्या हक्कासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल,’ असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.
पाहणीवेळी युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे, विभाग प्रमुख अथर्व गांगण उपस्थित होते. तर निवेदन सादरीकरणाच्या वेळी युवासेनेचे उपतालुका प्रमुख रितेश लोखंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.