swt७७.jpg
५५८६०
कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना आशिष पेडणेकर सोबत मोहन होडावडेकर, संतोष राणे, नकुल पार्सेकर, राजन नाईक, मनोज वालावलकर आदी. (छाया : अजय सावंत)
गाव तिथे उद्योजक घडविण्यासाठी ‘उद्योजक परिषद’
आशिष पेडणेकर : कुडाळात १५, १६ ऑगस्टला नूतन कार्यालयाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या वतीने १५ व १६ ऑगस्ट रोजी येथील एमआयडीसी येथे कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि भव्य ''उद्योजक परिषद'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील तरुणांच्या स्वप्नांना पंखांना बळ देण्यासाठी, नवीन पिढीचा उद्योजक तयार करण्यासाठी गाव तिथे उद्योजक हा उपक्रम हाती घेतला जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर यांनी दिली.
येथील एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संतोष राणे, मोहन होडावडेकर, नकुल पार्सेकर, मनोज वालावलकर, राजन नाईक, कुणाल वरसकर, विजय केनवडेकर, बाबा टोपले आदी उपस्थित होते.
श्री. पेडणेकर म्हणाले, गाव तिथे उद्योजक तयार करण्याची संकल्पना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर या संघटनेने मांडली आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गातील तरुणांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम चेंबर्स करणार आहे. बँकेतून येणाऱ्या अडचणी, उद्योजक बनण्यासाठीचा मार्ग आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असणारी प्राथमिक कागदपत्रे याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन आता तरुणांना मिळणार असल्याने सिंधुदुर्गातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे. सिंधुदुर्गातच रोजगार व उद्योग उपलब्ध होणार असल्यामुळे येथील तरुणांना आता नोकरीसाठी बाहेर गावी जाण्याची चिंता करण्याची गरज उरणार नाही. १९२६ मध्ये शेठ वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था पुढील वर्षी आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असून, गेल्या ९९ वर्षांपासून महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि उद्योजकांच्या हितासाठी सतत कार्यरत आहे.
कुडाळ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, प्रमोद जठार, जिल्हाधिकारी आदींची विशेष उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. या परिषदेमध्ये उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन, एमएसएमई, स्टार्टअप्स, निर्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, कौशल्य विकास, गुंतवणूक, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
कोकणातील उद्योग, व्यापार आणि उद्योगांना चालना देणे, स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणे, नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरतर्फे सर्व उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रात रुची असलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष राणे (उपाध्यक्ष - कोकण) आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांतर्फे केले आहे.