-rat७p९.jpg-
26O55836
चिपळूण ः पोफळी येथे महामार्गावर पडलेले खड्डे.
-------
गुहागर–विजापूर महामार्गाची चाळण
पोफळी परिसरात खड्डे; अपघातांचा धोका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरगाव, पोफळी, सय्यदवाडी, पोफळी नाका, तळसर आणि मुंडे परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महामार्गावर जागोजागी पडलेल्या भव्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. अचानक खड्डा समोर आल्यास भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या वाहनांच्या मार्गात जात असल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी तर समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतामुळे खड्डे दिसत नाहीत. परिणामी, रात्रीचा प्रवास अधिक जीवघेणा बनला आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनांना सतत ब्रेक लावावे लागत असून, प्रवाशांना तीव्र धक्के सहन करावे लागत आहेत. नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.
पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होणार हे माहीत असूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना का केली नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ तात्पुरती मलमपट्टी आणि कागदी पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचा आव आणला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. रस्ता बांधकामाची निकृष्ट गुणवत्ता, पाण्याचा अयोग्य निचरा आणि देखभालीचा अभाव यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-------
कोट १
शिरगाव, पोफळी, सय्यदवाडी, पोफळी नाका, तळसर आणि मुंडे परिसरातील खड्ड्यांची तातडीने पाहणी करून ते बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
- राजेंद्र खेतले, जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक शाखा
---