rat8p3.jpg-
56006
राजवाडीः येथे लोंबकळणाऱ्या विद्युततारांची पाहणी करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, पंचायत समिती सदस्य दत्ता लाखन, अरविंद जाधव, बंड्या लिंगायत आदी.
राजवाडीतील लोंबकळणाऱ्या विद्युततारांचा धोका
ग्रामस्थांची महावितरणकडे दुरूस्तीची मागणी; संतोष थेराडे यांनी केली पाहणी
संगमेश्वर, ता. ९ : तालुक्यातील राजवाडी गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युततारा अनेक दिवसांपासून धोकादायकरित्या लोंबकळत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठा अपघात घडण्यापूर्वी महावितरणने तातडीने दुरूस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली आहे.
राजवाडी येथील लोंबकळणाऱ्या विद्युततारांबाबत ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत थेराडे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून धोकादायक अवस्थेत असलेल्या विद्युततारांची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वी आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विद्युततारा अनेक दिवसांपासून अशाच धोकादायक अवस्थेत असून, याबाबत वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, पावसाळ्यात विद्युततारा अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने विलंब न करता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी पाहणी करताना पंचायत समिती सदस्य दत्ता लाखन, अरविंद जाधव, बंड्या लिंगायत आदी उपस्थित होते.