swt103.jpg
56375
कुडाळ ः कोमसाप शाखा कुडाळ आयोजित ‘ये रे घना’ कवी संमेलनाचे अध्यक्ष सीए के. एल. फाटक, आनंद वैद्य, मंगेश मसके, मनोहर सरमळकर, सुरेश पवार, प्रा. दीपाली काजरेकर, स्वाती सावंत यांच्यासह उपस्थित सहभागी कवी. (छायाचित्र ः अजय सावंत)
तरुणांनी ‘कोमसाप’च्या साहित्य प्रवाहात यावे
के. एल. फाटक ः कुडाळ संत राऊळ महाविद्यालयात कवी संमेलन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षांखालील युवकांसाठी एखादे कवी संमेलन घ्यावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक सीए के. एल. फाटक यांनी केले. येथील संत राऊळ महाविद्यालयात आयोजित कवी संमेलनात ते बोलत होते.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीने येथील संत राऊळ महाराज महाविद्यलयात ''ये रे घना'' कवी संमेलनाचे रविवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री. फाटक होते. या कवी संमेलनाला कुडाळ तालुक्यासोबतच जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद लाभला.
ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कवीसंमेलनाचा प्रारंभ झाला. श्री. रणसिंग यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक डॉ. दीपाली काजरेकर यांनी केले. यावेळी मंगेश मसके, अनंत वैद्य, संतोष वालावलकर, सुरेश पवार, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, संदीप साळसकर, नीलेश जोशी उपस्थित होते. स्नेहा फणसळकर यांनी आभार मानले.
कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागातून कवी या कविसंमेलनात सहभागी झाले होते. त्यांनी ''पाऊस'' या विषयासोबतच अन्य विषयांवर देखील कविता सादर केल्या. मालवणी कवितांची मेजवानी देखील काही कवींनी दिली.
यावेळी अनंत वैद्य, डॉ. दीपाली काजरेकर, प्रा. संतोष वालावलकर, मनोहर सरमळकर, सुरेश पवार, स्नेहा फणसळकर, स्वाती सावंत यांच्यासह नेहा कशाळीकर, राजेंद्र गोसावी, कृष्णा गवस, रामचंद्र शिरोडकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर, मनीषा पाताडे, सदानंद रानडे, श्रावणी मढव, आर्यन गोलतकर, दीपा मेस्त्री, मेधा मणेरीकर, संदीप साळसकर, अदिती मसुरकर, पी. बी. कदम, रिमा भोसले, राजन भोसले, प्रा. डॉ. एस. टी. आवटे, आर्या जडये यांनी बहारदार कविता सादर केल्या.
श्री. फाटक यांनी देखील आपली १९५४ सालात लिहिलेली पावसावरची कविता सादर करून मनोगत व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेची साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सहभागी सर्व कवींचे अभिनंदन केले. यावेळी कवी अनंत वैद्य यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले.