-rat१२p३४.jpg-
26O56910
लांजा ः उड्डाणपुलावरून वेगाने खाली कोसळणारे पाणी.
----
लांज्यातील उड्डाणपुलावर ‘कृत्रिम धबधबा’
भिंतीतून पावसाचे पाणी गळती; कामाच्या दर्जावर शंका
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १३ ः शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या भिंतीतून पावसाचे पाणी गळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुलाच्या भिंतीतील ब्लॉक्सच्या सांध्यांमधून पाण्याचा प्रवाह खाली कोसळत असून, महामार्गालगत कृत्रिम धबधबा तयार झाला आहे.
लांजा शहरात महामार्गाचे काम गेली १३ वर्षे सुरू आहे; परंतु सेवारस्ता, फूटपाथ, गटारे, अंडरपास, भरावाच्या भिंतीच्या ढासळलेल्या प्लेट अशा विविध विषयांमुळे लांजातील काम चर्चेत आहे. शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तहसील कार्यालयासमोरील उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी आउटलेट पाईप्सची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी भिंतीच्या आतील भागातून झिरपून बाहेर पडत आहे. परिणामी, पाणी भिंतीतून थेट सेवारस्त्यावर कोसळत आहे.
भिंतीच्या आतील भागातून सातत्याने पाणी वाहत राहिल्यास तेथील माती व खडी वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भिंतीचे ब्लॉक्स कमकुवत होऊन सुटण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात उड्डाणपुलाच्या संरचनेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
----
कोट
पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी किंवा मजा लुटण्यासाठी अन्यत्र कुठेही न जाता आमच्या लांज्यात यावे. उड्डाणपुलाच्या भिंतीतून हा मानवनिर्मित धबधबा तयार करण्यात आला आहे.
--अभी राजेशिर्के, तालुकाप्रमुख, युवासेना ठाकरे गट
---