सहा हजार विद्यार्थी, नागरिकांचे ''आधार'' अद्ययावत
ज्ञानेश्वर कुलकर्णी ; पोस्ट ऑफिसमधीले सेवांचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी व अद्ययावतीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार सेवेसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसला प्राधान्य देत आहेत, चालूवर्षी एकूण ५ हजार ५८४ विद्यार्थी आणि ५५२ नागरिकांना आधारविषयक सेवा दिल्या आहेत, अशी माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी दिली.
आधारकार्ड हे आज प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक ओळखपत्र बनले आहे. शासनाच्या विविध योजना, बँकिंग सेवा, शैक्षणिक प्रवेश, मोबाईल सिम, शासकीय लाभ तसेच इतर अनेक कामांसाठी हे कार्ड आवश्यक ठरत असल्याने नागरिक पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रांना पसंती देत आहेत. पोस्ट ऑफिस हे भारत सरकारचे विश्वासार्ह खाते असल्यामुळे येथे पारदर्शक सेवा, निश्चित शुल्क आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धती उपलब्ध आहे. यामुळे आधार सेवा घेण्यासाठी नागरिकांचा पोस्ट ऑफिसवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. डाक विभागाने आवश्यक यंत्रणा सक्षम करून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत आधार अद्ययावत केली आहेत. एकावेळी ४० पेक्षा जास्त ग्राहकांसाठी विशेष आधार कॅम्प आयोजित करण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
चौकट
येथे मिळतील सुविधा
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये हे केंद्र कार्यरत आहे. याद्वारे नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाची सुविधा मिळते. यामध्ये रत्नागिरी प्रधान डाकघर, शहरातील सर्व पोस्ट ऑफिस, तसेच खालगाव (जाकादेवी), पाली, सैतवडा, संगमेश्वर, राजापूर, देवरूख, लांजा, साखरपा, पाचल, कसबा, ओणी आणि कोंडये (राजापूर) येथील पोस्ट ऑफिसचा समावेश आहे.