kan256.jpg
59491
कणकवली ः येथील कार्यक्रमात अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना अजय कांडर, अभय खडपकर, सुहास वरुणकर, दयानंद मुळे, ममता, मुळे, विनिता वरुणकर आदी.
संत नामदेवांच्या गवळणींनी अधोरेखित केले ग्रामीण भाषेचे महत्त्व
अजय कांडर ः अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे कणकवलीत प्रकाशन
कणकवली, ता. २६ : मालवणी मुलुखात प्रचंड लोकप्रिय झालेल्या गवळणी ह्या संत नामदेव महाराजांनी लिहिल्या आहेत. जनसामान्यांना सहज कळेल अशा भाषेत संत नामदेव महाराजांनी गवळण लिहून ग्रामीण भागातील भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. नामदेवांच्या विचारांची ही संवेदनशीलता मालवणी मुलखातील कवी अमेय मुळे यांच्या कवितेत जाणवते. अमेय मुळे यांनी भविष्यात अधिक गंभीरपणे काव्यलेखन केल्यास त्यांचा काव्यप्रवास निश्चितच उज्ज्वल होईल, असा विश्वास नामवंत कवी व प्रसिद्ध स्तंभलेखक अजय कांडर यांनी व्यक्त केला.
कणकवली शहरातील कवी अमेय मुळे यांच्या ‘काही ओलावलेली पाने’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवली’तर्फे कणकवली शिवाजीनगर येथील संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी अभिनेते अभय खडपकर, सुहास वरुणकर, दयानंद मुळे, ममता मुळे, विनिता वरुणकर आदी उपस्थित होते. अजय कांडर म्हणाले, संत नामदेव महाराजांच्या लेखनातून भाषेची ताकद आणि संवेदनशीलता दिसून येते. त्याच संवेदनशीलतेचा प्रत्यय अमेय मुळे यांच्या कवितांमधून येतो. त्यांच्या कवितांमध्ये अनुभव, भावना आणि सभोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. भविष्यात त्यांनी अधिक गांभीर्याने आणि सातत्याने काव्यलेखन केल्यास त्यांच्या साहित्यिक प्रवासाला निश्चितच मोठी उंची मिळेल.
कोट
कवी हा समाजापासून वेगळा नसतो. तोही त्याच समाजात जगतो, त्याच वेदना अनुभवतो आणि त्याच आनंदात सहभागी होतो. त्यामुळे कवितेमध्ये केवळ वैयक्तिक भावना नसतात, तर समाजाचे प्रतिबिंबही असते. साहित्य हे समाजाचा आरसा मानले जाते. त्या आरशात दिसणारे चित्र कधी सुंदर, तर कधी अस्वस्थ करणारे असते; मात्र ते सत्य असते. त्या सत्याला शब्द देणे हे कवीचे काम आहे. त्यामुळे कविता हा केवळ साहित्यप्रकार नसून जीवन समृद्ध करणारा एक सुसंस्कार आहे.
- अमेय मुळे, कवी