rat२९p१९.jpg
६०४३५
राजापूर ः पाचल येथे ग्रामपंचायतीतर्फे लाभार्थ्यांना साहित्य वाटप करताना आमदार किरण सामंत आणि मान्यवर.
पाचलच्या विकासासाठी
निधी कमी पडू देणार नाही
किरण सामंत ः दिव्यांग व गरजूंना साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः ‘‘राजापूर तालुक्यामध्ये राजापूरनंतर वेगाने विकसित होणारी पाचल ही दुसऱ्या क्रमांकाची प्रमुख बाजारपेठ आहे. पाचलच्या विकासासाठी आमदार निधी, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही पाचल गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,’’ अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दिव्यांग व गरजवंत लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. तसेच, दिव्यांग व गरजवंतांना मदत करण्याचा ‘स्मार्ट’ ग्रामपंचायत पाचलचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आमदार सामंत म्हणाले, ‘‘पावस-ओणी-पाचल ते विठ्ठा बाजार या महत्त्वाच्या रस्त्याच्या सुधारणेला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, यासाठी तब्बल ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तळवडे-पाचल पुलासाठी निधी प्राप्त झाला असून पांगरी गावच्या पुनर्वसनासाठीही आर्थिक तरतूद केली आहे. याशिवाय, भारतमाता प्रभाग संघासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.’’
पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पंचायत समिती सदस्य अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, प्रसाद मोहरकर, माजी सरपंच अशोक सक्रे, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अण्णा पाथरे, सुरेश ऐनारकर, विभागप्रमुख शैलेश साळवी, सिद्धार्थ जाधव, संजय पाथरे उपस्थित होते. सरपंच बाबालाल फरास यांनी स्वागत केले. सिद्धार्थ जाधव यांनी सूत्रसंचालन केले.