rat२p३५.jpg -
26O61332
मालघर : येथील श्रीराम मंदिरात दोन बालकथा संग्रहांचे प्रकाशन नाट्यपूर्ण पद्धतीने झाले. त्या प्रसंगी लेखिकेसह बालगोपाळ आणि मान्यवर.
---
गरुड अन् थेंब अवतरले रंगमंचावर
मालघरमध्ये बालकथांचा अनोखा प्रकाशन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : साक्षात श्रीरामांच्या साक्षीने रंगमंचावर पाठीमागे दप्तर लावून पाण्याचा थेंब आणि गरूड अवतरले. यामुळे भक्तगण, प्रेक्षक अवाक् झाले. क्षणभर ‘हे काय’ असा चेहरा करून सारे पाहू लागले. हा नाट्यमय क्षण होता, गरूडाचे गर्वहरण आणि थेंबाची सफर या दोन बालकथांच्या मालघर येथे झालेल्या पुस्तकांचे प्रकाशन प्रसंगीचा.
मालघर-चिपळूण येथील प्रसिद्ध लेखिका संध्या साठे-जोशी यांनी ही दोन पुस्तके लिहिली असून, श्रीराम मंदिर मालघर येथे नुकत्याच पार पडलेल्या रामनाम जपयज्ञ अर्थात् एक्क्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. बालवाचकांकडूनच नाट्यपूर्णरितीने पुस्तकांचे प्रकाशन झाले. लेखिका संध्या साठे-जोशी यांनी प्रभू रामचंद्रांसमोर एका पुस्तकाचे प्रकाशन देवळात करण्याची इच्छा पूर्ण झाली, असे सांगितले. मृदुला पेंडसे यांनी दोन्ही पुस्तकाबाबत साधेसोपे विनोद, खिळवून ठेवणारं कथानक, मुलांना आवडेल-समजेल अशी लेखनशैली ही या पुस्तकांची निर्विवाद वैशिष्ट्ये आहेत असे सांगितले. लेखिकेची या आधी लॉकडाऊन आणि यमुनातिरी आनंदे हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. श्रीकांत बापट यांनी प्रास्ताविक केले. मंगेश बापट यांनी सूत्रसंचालन केले.