-rat९p२३.jpg-
26O62824
राजापूर ः श्रावणधारा काव्यसंमेलनाला उपस्थित कवी.
----
श्रावणधारांत रंगले काव्यसंमेलन
निमंत्रित कवींच्या सादरीकरणाला रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता.१० ः हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या आणि ऊन-पावसाच्या खेळामुळे सध्या श्रावणाचे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. याच निसर्गरम्य वातावरणात रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात श्रावणधारा या निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन झाले.
महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग शाखा, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे काव्यसंमेलन झाले. दक्षिण कोकण युवाशक्ती प्रमुख अरुण मौर्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश सकपाळ, प्र. प्राचार्य डॉ. मेश्राम, डॉ. पाटील, डॉ. दाभाडे आदी उपस्थित होते. कवी अरुण मौर्ये यांनी ‘नवरंगाचा उघडून पंखा हा श्रावण आला दारी’ या काव्यपंक्तींमधून श्रावणातील निसर्गाचे चित्र उभे केले. नरेश पाचलकर यांनी ‘अरे पावसा पावसा, नको बरसू रे असा’ या कवितेतून पावसाचे रौद्ररूप मांडले. हेमंत लब्दे, डॉ. विकास पाटील, नागेश साळवी, प्रमोद जाधव, मानसी सुर्वे, स्नेहल चव्हाण, श्रुती फुटक व मालवी होरंबे यांनीही कविता सादर केल्या. विद्यार्थी काव्यवाचनात निर्मिती जाधव हिने प्रथम, सिद्धी चव्हाण हिने द्वितीय तर तुलसी वरेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
---