-rat१०p६.jpg -
26O63002
चिपळूण : चिपळूण येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंता वृषाली पाटील यांच्याशी महामार्गाच्या कामासंदर्भात चर्चा करताना आमदार किरण सामंत, शेखर निकम.
-------
चाकरमान्यांच्या गर्दीने घाटमार्गांची परीक्षा
वाहतूक नियोजनाचे आव्हान ; आमदारांकडून महामार्गाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध शहरांतून लाखो चाकरमानी कोकणाकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे कोकणात येण्यासाठीच्या सहा घाटमार्गांवर वाहतुकीचा मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागापुढे नियोजन करावे लागणार आहे.
रत्नागिरी, रायगड आणि कोकणाला जोडणारे कुंभार्ली, आंबा, अणुस्कुरा, ताम्हिणी, वरंधा आणि महाबळेश्वर हे घाट यंदाच्या गणेशोत्सवात महत्त्वाचे ठरणार आहेत. एका घाटावर अडथळा निर्माण झाल्यास वाहतूक पर्यायी मार्गावर वळून दुसऱ्या घाटावर ताण वाढू शकतो. त्यामुळे केवळ एका घाटाचे नव्हे तर सर्व प्रमुख घाटांचे एकत्रित नियोजन करण्याची गरज आहे. कराड-चिपळूण मार्गावर वाहनांची संख्या वाढल्यास वळणांवर वाहतूक संथ होण्याची शक्यता आहे. धोकादायक ठिकाणी बॅरिकेटिंग, दिशादर्शक फलक, पोलिस गस्त आणि बिघाड झालेली वाहने हटवण्यासाठी क्रेन आवश्यक आहे.
दुरुस्ती व सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अडथळे निर्माण झाल्यास वाहतूक अणुस्कुरा घाटाकडे वळू शकते. आंबाघाटाला पर्याय ठरणाऱ्या या मार्गावर खासगी आणि अवजड वाहनांचा ताण वाढू शकतो. वाहतूक नियंत्रणासह मदत पथक व क्रेन सज्ज ठेवणे आवश्यक आहे. पुणे-माणगाव मार्गावरून मोठ्या प्रमाणात खासगी वाहने येण्याची शक्यता आहे. वेग नियंत्रण आणि वळणांवर पोलिस तैनात करणे गरजेचे आहे. दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक प्रभावित झाल्यास पर्यायी मार्गांवर ताण वाढू शकतो. मार्गबदलाची माहिती आगाऊ देण्याची आवश्यकता आहे. पाऊस, धुके आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन धोकादायक वळणांवर बॅरिकेडिंग, पोलिस बंदोबस्त आणि तातडीचे मदत पथक ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा व वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच महामार्गावरील अपूर्ण कामे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि गणेशोत्सवातील संभाव्य गर्दी यावर त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा केली.
-------
कोट १
गणेशोत्सवात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. घाटात एखादे वाहन बंद पडले तरी कोंडी लांबते. त्यामुळे क्रेन, मदत पथक आणि पोलिस बंदोबस्त सज्ज ठेवणे आवश्यक आहे.
-गणेश कदम, ग्रामस्थ, चिपळूण
---
कोट २
महामार्ग आणि घाटमार्गांवरील संभाव्य वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वयाने नियोजन केले जाईल.
-राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी