India vs Australia Chennai Test Match tied in 1986 Sakal
Cricket

On This Day: दीडशे वर्षांच्या इतिहासात दोनच कसोटी मॅच 'टाय', ज्यात भारताच्याही सामन्याचा समावेश; जाणून घ्या त्याबद्दल

India vs Australia Chennai Test Match tied in 1986 : कसोटीमध्ये जे दोन सामने टाय झाले आहेत, त्यात भारताच्या चेन्नईला झालेल्या एका सामन्याचाही समावेश आहे. त्या सामन्याबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

On This Day in Cricket 22 September: कसोटी हा क्रिकेटमधील सर्वाधिक काळ खेळ चालणारा प्रकार आहे आणि सर्वात जुना प्रकार आहे. यामुळे कसोटीला क्रिकेटमध्ये एक वेगळा दर्जाही आहे. कसोटी हा असा प्रकार आहे, ज्यात विजय किंवा पराभव होऊ शकतोच. पण या प्रकारात सामना अनिर्णित राखून पराभव टाळण्याचीही संधी संघांना मिळते.

त्यामुळे बऱ्याचदा एकतर एखादा संघ सामना जिंकतो किंवा पराभूत होतो किंवा सामनाच अनिर्णित राहतो. पण याबरोबरच आणखी एक निकाल लागू शकतो, तो म्हणजे सामना बरोबरीत राहण्याचा. मात्र कसोटी सामना बरोबरीत संपणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

क्रिकेट खेळाला आता दिडशेपेक्षाही अधिक वर्षांचा इतिहास आहे. यामध्ये आत्तापर्यंत केवळ दोन कसोटी सामने बरोबरीत सुटलेत. सर्वात आधी बरोबरीत सुटलेला कसोटी सामना झालेला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात ब्रिस्बेन येथे. हा सामना डिसेंबर १९६० साली झाला होता.

त्यानंतर १९८६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेला सामनाही बरोबरीत सुटला होता. आता याच सामन्याबद्दल जाणून घेऊ.

ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

चेन्नईला १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना झालेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ७ बाद ५७४ धावांवर घोषित केला.

ऑस्ट्रेलियाकडून डीन जोन्स यांनी २१० धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड बून यांनी १२२ धावांची खेळी केली, तर कर्णधार ऍलेन बॉर्डर यांनी १०६ धावांची खेळी केली. भारताकडून शिवलाल यादव यांनी ४ विकेट्स घेतल्या होत्या.

प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ९४.२ षटकात सर्वबाद ३९७ धावा केल्या. भारताकडून कर्णधार कपिल देव यांनी ११९ धावांची शतकी खेळी केली. रवी शास्त्री (६२), के श्रीकांत (५३) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५०) यांनी अर्धशतके केली होती. तरी भारतीय संघ १७७ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियाकडून ग्रेग मॅथ्युज यांनी ५ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव सामन्याच्या अखेरच्या दिवशी सुरुवातीलाच ५ बाद १७० धावांवर घोषित केला. डेव्हिड बून यांनी सर्वाधिक ४९ धावा केल्या होत्या, तर भारताकडून मनिंदर सिंग यांनी ३ विकेट्स घेतल्या होत्या, तर रवी शास्त्री यांनी २ विकेट्स घेतल्या होत्या.

शेवटच्या डावातील रोमांच

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव घोषित करून भारतासाठी शेवटच्या दिवशी ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी भारताकडून के श्रीकांत आणि सुनील गावसकर यांनी चांगली सुरूवात केली. तरी श्रीकांत ३९ धावांवर बाद झाले. पण नंतर मोहिंदर अमरनाथ यांनी गावसकरांची साथ दिली. मात्र दुसरे सत्र संपण्याआधी अमरनाथ ५१ धावांची अर्धशतकी खेळी करून बाद झाले. तरी भारताची दुसरे सत्र संपले तेव्हा २ बाद १९० अशी धावसंख्या होती.

त्यानंतरही गावसकरांनी ९० धावांची खेळी केली. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन (४२), चंद्रकांत पंडित (३९), चेतन शर्मा (२३) यांनी छोटे खानी पण आक्रमक खेळी केल्या. तरी भारताने ३३० धावांपर्यंत ६ विकेट्स गमावल्या होत्या. केवळ १८ धावांची गरज भारताला अखेरच्या ५ षटकांमध्ये होती आणि चार विकेट्स हातात होत्या. विशेष म्हणजे रवी शास्त्री मैदानात होते आणि आक्रमक खेळत होते.

मात्र एकाच षटकात चेतन शर्मा आणि किरण मोरे यांना रे ब्राईट यांनी माघारी धाडले. भारताच्या ३४४ धावा झालेल्या असताना आणि केवळ ४ धावांची विजयासाठी गरज असताना शिवलाल यादवही ८ धावांवर बाद झाले. त्यामुळे सामना अशा परिस्थितीत उभा होता की चारही निकाल लागू शकले असते.

शेवटच्या षटकात ग्रेग मॅथ्युज गोलंदाजीसाठी आले. भारताला ४ धावा हव्या असताना रवी शास्त्री यांनी या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर २ धावा पळाले. त्यांनी तिसऱ्या चेंडूवर एकच धाव काढता आली. त्यामुळे शेवटच्या तीन चेंडूत १ धाव असं समीकरण होतं.

म्हणजे भारत सामना पराभूत होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. पण तरी भारताने सामना जिंकलाही नव्हता. धावसंख्या बरोबरीची होती. अखेर मॅथ्युज यांनी पाचव्या चेंडूवर मनिंदर सिंग यांना पायचीत पकडले आणि भारताचा संघ सर्वबाद झाला. त्यामुळे भारतालाही ८६.५ षटकात दुसऱ्या डावात ३४७ धावा करता आल्या. यामुळे सामना बरोबरीत संपला.

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्युज यांनी ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्यासह ब्राईट यांनीही ५ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यानंतर आत्तापर्यंत एकही कसोटी सामना बरोबरीत सुटला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT