Ranji Trophy final Mumbai vs Vidarbha  sakal
Cricket

Ranji Trophy : अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर फुसके बार; लॉर्ड ठाकुरने ठोकले अर्धशतक तरीही मुंबई 224 ऑलआऊट

बिनबाद ८१ वरून ६ बाद १११ अशी दारूण घसरगुंडी उडालेल्या मुंबईला पुन्हा एकदा सावरण्यास शार्दुल ठाकूर सरसावला.

Kiran Mahanavar

Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव... सलामीवीरांनी दिलेली उत्तम सुरुवात, तरीही नावाजलेले अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फुसके बार ठरले. बिनबाद ८१ वरून ६ बाद १११ अशी दारूण घसरगुंडी उडालेल्या मुंबईला पुन्हा एकदा सावरण्यास शार्दुल ठाकूर सरसावला. त्यामुळे कोठे रणजी अंतिम सामन्यात २२४ धावा करता आल्या. त्यानंतर याच शार्दुलने एक विकेटही मिळवली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर विदर्भची ३ बाद ३१ अशी अवस्था झाली.

यंदाच्या रणजी क्रिकेट मोसमात तळाच्या फलंदाजांनी मुंबई संघाला वारंवार सावरले आहे, पण हा अंतिम सामना असल्यामुळे प्रामुख्याने कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरवरची जबाबदारी अधिकच वाढते. असे असतानाही ते बेजबाबदार फटके मारून बाद होतात. याचा फटका संघाला बसतो आणि पहिल्याच दिवशी चांगल्या सुरुवातीनंतर पाय खोलात जातो.

वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर हिरवे गवत असल्याने विदर्भने नाणेफेक जिंकल्यावर मुंबईला प्रथम फलंदाजी देणे स्वाभाविक होते. मात्र पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी २० षटकांत ८१ धावांची सलामी दिली तेव्हा मुंबईचा संघ वर्चस्व गाजवणार असे चित्र होते; परंतु त्यानंतर ३० धावांत ६ फलंदाज बाद झाल्यामुळे मुंबई संघाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड चालवली.

१८ षटकांच्या या खेळात विदर्भच्या गोलंदाजांनी इतर कोणतेही प्रयोग न करता टप्पा आणि दिशा अचूक ठेवला. पृथ्वी शॉ (४६), लालवानी (३७) यानंतर मुशीर खान (६), अजिंक्य रहाणे (७) आणि श्रेयस अय्यरही (७), हार्दिक तामोरे (५) अशी दयनीय घसरगुंडी झाली.

मुळात लालवानी उजव्या यष्टीबाहेर असलेला चेंडू खेळण्याची गरज नसताना यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ पृथ्वी सरळ चेंडू स्वीप करताना उजवी यष्टी गमावून बसला. मुशीर खान पायासमोर पडलेल्या चेंडूवर पायचीत झाला.

श्रेयस रणजीतही अपयशी

रणजी क्रिकेट न खेळल्यावरून श्रेयसला वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशा परिस्थितीत त्याने आता रणजी सामन्यात भरभरून धावा करणे अपेक्षित होते, पण आज केवळ सात धावा केल्यावर तो उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळताना सोपा झेल देऊन बाद झाला. तो फलंजाजीस आल्यावर विदर्भकडून अक्षय वाडकरने उमेश यादवला गोलंदाजीस आणले होते.

पूर्ण मोसमात चाचपडत असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी आजचा दिवसही वेगळा नव्हता. सात धावांसाठी त्याने ३५ चेंडूंचा सामना केला. अखेर उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात त्यानेही विकेट बहाल केली.

शार्दुल पुन्हा तारणहार

उपांत्य फेरीतही मुंबईची अशीच अवस्था झालेली असताना शार्दुल ठाकूरने झंझावाती शतक करून मुंबईला सावरले होते. आजही तो तीच जबाबदारी सांभाळत होता. ६ वा फलंदाज १११ धावांवर बाद झाल्यावर शार्दुल फलंदाजीस आला. त्याने कोणतेही दडपण न घेता प्रतिहल्ला सुरू केला. त्याने मारलेला पहिला चौकार हा १०७ चेंडूनंतरचा मुंबईसाठी पुढचा चौकार होता. शार्दुलच्या या हल्ल्यामुळे जेथे दीडशे धावा कठीण होत्या तेथे मुंबईने दोनशे धावांचा टप्पा पार केला. दुर्दैवाने तो शतक करू शकला नाही.

धवल कुलकर्णीचा दणका

फलंदाजांच्या अपयशानंतर मुंबईची मदार गोलंदाजांवर होती आणि आपला अखेरचा रणजी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने दोन धक्के दिले. त्या अगोदर शार्दुलने एक विकेट मिळवली. त्यामुळे विदर्भही ३ बाद ३१ असे संकटात सापडला आहे.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः ६३.२ षटकांत सर्वबाद २२४ (पृथ्वी शॉ ४६, भूपेन लालवानी ३७, मुशीर खान ६, अजिंक्य रहाणे ७, श्रेयस अय्यर ७, हार्दिक तामोरे ५, शम्स मुलानी १३, शार्दुल ठाकूर ७५ - ६६ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार, तनुष कोटियन ८, तुषार देशपांडे १४, उमेश यादव १३.३-२-४३-२, हर्ष दुबे २०-३-६२-३, यश ठाकूर ११-२-५४-३)

विदर्भ, पहिला डाव ः ३ बाद ३१ (अथर्व तायडे खेळत आहे २१, शार्दुर ठाकूर ५-०-१४-१, धवल कुलकर्णी ६-२-९-२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT