Sangli Lok Sabha Congress leader Vishal Patil
Sangli Lok Sabha Congress leader Vishal Patil esakal
लोकसभा २०२४

माझं काँग्रेसवर एकतर्फी प्रेम! कितने भी तू करले सितम, हंस हंस के सहेंगे हम म्हणत विशाल पाटलांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

सकाळ डिजिटल टीम

जुना वाद संपवा, या जयंतरावांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना विशाल पाटील म्हणाले, ‘ज्या दिवशी राजारामबापू वारले, त्या दिवशी त्यांच्याशी असलेला वाद संपला, असे वसंतदादांनी सांगितले होते.

सांगली : वसंतदादा घराण्याचे काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे. माझे बंड काँग्रेस विरोधात नाही, हे बंड काँग्रेस पक्षाचेच आहे. सांगलीच्या रक्तात बंडखोरी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी म्हणते आमचे चिन्ह नेले, सांगलीकरांचे तेच म्हणणे आहे, आमचे चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय. आता वेगळ्या चिन्हावर येथे काँग्रेसचाच खासदार होणार. माघार घ्यायची तर महाविकास आघाडीने घ्यावी. वेळ गेलेली नाही, मला काँग्रेसचा एबी फॉर्म द्यावा, असे आवाहन करत विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदार संघातून लढाईचे रणशिंग फुंकले.

काँग्रेस भवनसमोरील चौकात कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आधी श्री गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा काढली. ‘वारं फिरलंय, आमचं ठरलंय’, असा नारा देत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ‘काकाला सांगा, दादा आलाय’, अशा घोषणा दिल्या. फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांची उधळण झाली. क्रेनव्दारे हार घालण्यात आला. तळपत्या उन्हात सभा झाली.

माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील, शैलजा पाटील, बाजार समिती सभापती सुजय शिंदे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, किशोर शहा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, पूजा पाटील, वीरेंद्र पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, ‘वसंतदादा दोन वर्षांचे असताना अनाथ झाले. लोकांनी साथ, पाहुण्यांनी आधार दिला. तरुणपणात काँग्रेस सापडली. काँग्रेसने वसंतदादा घडवले. दादांनी काँग्रेसच्या बळावर स्वातंत्र्य लढा दिला. आज काँग्रेस विरोधात जाताना भावना होत नाही. मी २५ वर्षे पक्षाचे काम करतोय. कोणत्याही मुलाला बापासारखे, आजोबासारखे व्हावे, असे वाटू शकते.

त्यात चूक काय? २००२ मध्ये मला जिल्हा परिषद लढवायची होती. पक्षातील लोक म्हणाले, घराणेशाही होईल, थांब. मी थांबलो. २००५ मध्ये वडील वारले. लोकसभा लढवायची इच्छा होती. माझ्याऐवजी घरात (प्रतीक पाटील) उमेदवारी मिळाली. मी थांबलो. पुढे होऊन काम केले. २०१९ मध्ये मी लढले पाहिजे, असे सगळ्यांचे म्हणणे होते. पक्षाने उमेदवारी नाकारली. दुसऱ्या पक्षातून लढण्यास सांगितले. पक्षावर एकतर्फी प्रेम असल्याने तेही केले.

पराभूत झालो, पण दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. काहीजण पुरात वाळू, प्लॉट शोधत होते. मी रस्त्यावर उतरलो. यंदा माझे वातावरण चांगले झाल्याने पुन्हा डाव रंगू लागला. विशालला थांबवलं पाहिजे, यासाठी बैठका झाल्या. मी वादात जायचं नाही, असं ठरवलं. मी लढत राहिलो. माझं काँग्रेसवर एकतर्फी प्रेम आहे. कितने भी तू करले सितम, हंस हंस के सहेंगे हम, अशी माझी भूमिका आहे.’

अजितराव घोरपडे म्हणाले, ‘ही वेळ इतिहास घडवण्याची आहे. विशाल पाटील यांच्याबाबत हे होणार, याची माहिती होती. मला नाडी बघून आजार कळतो. मी इथे बसून मुंबईची हवा सांगितली. आता मला निकाल काय लागणार, हेही माहिती आहे. देशातील भाजपला हद्दपार करायचे आहेच, दिल्लीत मोठे संकट आहेच, मात्र त्याहून मोठे संकट सांगलीत आहे.’

वैरातून घर अडचणीत

वसंतदादा घराण्यातही दीर्घकाळ संघर्ष झाला, मात्र या वैरातून घर संपत निघाले. त्यामुळे जयश्री वहिनींनी उघड भूमिका घेतली आहे, असे विशाल यांनी स्पष्ट केले. श्रीमती जयश्री पाटील म्हणाल्या, ‘या व्यासपीठावर येताना मला मदनभाऊंची आठवण आली. त्यांनीही बंड केले होते. आता विशाल मैदानात आहे. मी त्याला अर्ज भरतानाच सांगितले, माघार घ्यायची नाही. वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारे लाखो लोक आज सोबत आहेत. वसंतदादा घराण्याच्या विरोधात षड्‌यंत्र रचले जात आहे. आपसातील वैरातून घर अडचणीत आले. आता तसे होणार नाही. भाऊंनी नारा दिला होता, ‘मै हूँ ना...’ तुम्ही तेच म्हणा.’

बाळासाहेब सोबतीला, अंजनी पुत्राचे आशीर्वाद

‘वारं फिरलंय, आमचं ठरलंय’चा नारा विशाल यांनी उलगडून दाखवला. ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर अर्थात बाळासाहेब यांचा पाठिंबा आहेच, मात्र ‘इथे थेट नाव घेता येत नाही, मात्र सांगलीचे बाळासाहेब आपल्या सोबत ताकदीने उभे आहेत’, असे त्यांनी जाहीर केले. वसंतदादा घराण्याच्या लढाईत ‘अंजनी पुत्र’ नेहमी पाठीशी उभे राहिलेत, हे सांगत आर. आर. पाटील गटाने ताकद दिली असल्याचे सांगितले. माजी महापौर मैनुद्दीन बागवान व निरंजन आवटी यांनी मिरज पॅटर्न विशाल यांच्या पाठीशी उभा असल्याचे जाहीर केले.

खानापूर, आटपाडीतून आलेले लोक कुणामुळे आलेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत त्यांनी बेरजेचा हिशोब मांडला. व्यासपीठावर वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम, गुलाबराव पाटील, आर. आर. पाटील, जी. डी. बापू लाड, शिवाजीराव शेंडगे, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, अनिल बाबर, विठ्ठलदाजी पाटील, मोहनराव शिंदे, हाफिज धत्तुरे, संपतराव माने, नानासाहेब सगरे यांचे फोटो वापरले होते.

दादा-बापू वाद संपलाय

जुना वाद संपवा, या जयंतरावांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना विशाल पाटील म्हणाले, ‘ज्या दिवशी राजारामबापू वारले, त्या दिवशी त्यांच्याशी असलेला वाद संपला, असे वसंतदादांनी सांगितले होते. आमच्याकडून वाद संपलाय. तुमच्या मनात असेल तर संपवा. मी राजारामबापूंच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन, व्यासपीठावर फोटो लावून प्रचार सुरू केलाय.’

‘एबी’ अर्ज नाही : बाळासाहेब थोरात

नाशिक : सांगलीच्या विषयावर बैठक झाली. ही जागा काँग्रेसला हवी होती. मात्र, शिवसेनेने आग्रह धरला. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र, पक्षाने त्यांना एबी अर्ज दिला नाही. त्यांच्याशी संवाद सुरू आहे,’’ असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलाचा बळी नको

चंद्रहार पाटलांना, शेतकऱ्याच्या मुलाला विरोध का? या प्रश्‍नाला उत्तर देताना विशाल म्हणाले, ‘वसंतदादा घराण्याने शेतकऱ्यांच्या मुलांना नेहमीच बळ दिले आहे. शेतकऱ्याच्या मुलाने आमदार, खासदार व्हावे, अशी आमचीही भूमिका आहे, मात्र शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी जाता कामा नये, हेही आम्हाला पाहायचे आहे.’ यावेळी त्यांनी संजय राऊत यांनीही इशारा दिला. संजय राऊत गोंधळ घालून गेले. सांगली सुसंस्कृत आहे. येथे शोभणारी भाषा बोलावी. राजकारण संयमाने करा. भाषा सांभाळून वापरा, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT