बेतुल (मध्य प्रदेश) : "देशातील गरिबीला कॉंग्रेस जबाबदार आहे. कृषी क्षेत्र आणि गावांच्या विकासासाठी पूर्वी कोणतेही ठोस धोरण आखले नाही,'' असा दावा केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला.
बेतुल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुर्गादास ऊईके यांच्यासाठी गडकरी यांची प्रचारसभा मुलताई येथे झाली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही गरिबी हटविणे शक्य झाले नाही असा दावा करीत, मग सध्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गरिबी नष्ट करणे कसे शक्य होणार आहे, असा प्रश्न त्यांनी केला.
"कॉंग्रेसमुळेच आपल्या देशात दारिद्य्र आहे. आपला देश संपन्न आहे; पण देशातील लोक गरीब आहेत. याचे कारण म्हणजे शेती आणि गावांच्या विकासासाठी कोणतीही योजना गंभीरपणे राबविली नाही. यामुळेच गहू स्वस्तात उपलब्ध होतो, तर बिस्कीट महाग असते. फळे स्वस्त असतात; पण त्यांचा रस महाग मिळतो,'' अशी टीका गडकरी यांनी केली.
ते म्हणाले, की कॉंग्रेसच्या राजवटीत गरीब हा अधिक गरीब बनला. त्याच वेळी पक्षाच्या खुशमस्कऱ्यांनी स्वतःची गरिबीतून सुटका करून घेतली. जातीयवाद, धर्मवाद आणि दहशतीच्या राजकारणाचा वापर कॉंग्रेसने केला. मात्र भाजपला हे सर्व संपवायचे आहे. बेतुलमधून कॉंग्रेसकडून रामू टीकम हे रिंगणात उतरले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.