Police Action Mode
ESakal
तात्या लांडगे
सोलापूर : रात्रभर सुसाट धावणाऱ्या गाड्या, डोळ्यांत झोप आणि मिळेल त्या वडा-भजीपावावर दिवस काढत आरोपींच्या शोधात निघालेल्या खाकीचा हा रोजचाच संघर्ष आहे. पोलिसांना साप्ताहिक सुट्टीचेही स्वातंत्र्य नसते. कुटुंबासाठी वेळ, नातलगांचे कार्यक्रम हे सगळे अनेकदा कर्तव्यापुढे मागे पडते. गुन्हा घडताच अंगावरील कपड्यांनिशी बाहेर पडणाऱ्या खाकीमागे त्याग आणि जबाबदारीचे न बोललेले ओझे दडलेले आहे. बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तिहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी अजूनही पोलिसांची पथके परजिल्ह्यात आहेत. याशिवाय इतरही काही गुन्ह्यांतील आरोपींच्या शोधासाठी पोलिस बाहेरगावीच आहेत.
सोलापूर शहरात सात, तर ग्रामीण भागात २५ पोलिस ठाणी आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या अर्ध्या कोटींच्या घरात असून पोलिसांची संख्या अवघी पाच हजार आहे. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे १० हजार गुन्हे दाखल होतात. गंभीर गुन्ह्यांमध्ये (खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, अपहरण) गुन्हा घडताच अधिकारी-अंमलदारांना अंगावरील कपड्यांवरच आरोपींच्या शोधासाठी निघावे लागते. वर्षातील किमान १०० दिवस त्यांना तपासासाठी परगावी जावे लागते. पुण्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची घटना असो की स्वारगेट बसस्थानकावरील बसमध्ये तरुणीवर अत्याचार, अशा घटनांमध्ये नेहमीच पोलिसांना दोन दोन दिवस झोप घेता आलेली नाही. दरवर्षी पोलिसांत दाखल गुन्हे आणि उपलब्ध मनुष्यबळ व पोलिस ठाण्यांची संख्या कमीच आहे. त्यातही पोलिसांच्या तपासाचा रेषो खूपच उत्कृष्ट राहिला आहे.
जीव मुठीत धरून प्रवास
आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना खबऱ्यांच्या माहितीवरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माग काढत पुढे जावे लागते. त्यामुळे अनेक दिवस बाहेरगावी मुक्काम करावा लागतो. अनेकदा आरोपींकडे शस्त्रे असतात आणि जीवघेणे हल्ले होण्याचा धोका असतो; तरीही पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचतातच. अपुऱ्या झोपेमुळे आणि वेळेवर अन्न न मिळाल्याने अनेकांना रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्या जाणवू लागतात.
ठळक उदाहरणे
१) बोरामणी येथील तिहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार शंकर मस्केच्या शोधासाठी शनिवारी (ता. २) दुपारी पाच पथके रवाना झाली असून पोलिसांचा शोध अद्याप सुरू आहे. उळे येथील खून, पंचनामा, झेंडावंदन-परेड आणि त्यानंतरच्या या घटनेमुळे पोलिसांना चार दिवसांपासून झोप मिळालेली नाही.
२) रविवारी (ता. २) शहरात सुरेश श्रीराम याचा खून झाला. सुट्टीच्या दिवशीही पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शहर गुन्हे शाखा व जेलरोड पोलिसांनी दोन तासांत संशयितांना जेरबंद केले.
३) पंढरपुरातील आषाढी वारीत लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सलग ८ ते १० दिवस पायी फिरतात. पाणी आणि मिळेल ते खाऊन दिवस काढावा लागतो. तसेच अंजनगाव (ता. माढा) येथे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ४-५ दिवस सतत बंदोबस्त ठेवावा लागला.
४) सोलापुरातील क्रोमा सेंटरमधील ३६ लाखांची मोबाईल चोरी, चेन चोरी व घरफोडी प्रकरणांत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांना अनेक दिवस परजिल्ह्यात मुक्काम करावा लागला.
४८ तासांत ५ खून, यंत्रणेवर ताण
जिल्ह्यात दोन दिवसांत (३० एप्रिल, १ मे) पाच खून उघडकीस आले. बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे तीन तर उळे (ता. दक्षिण सोलापूर), पंढरपूर आणि वैराग (ता. बार्शी) या ठिकाणी प्रत्येकी एक खून झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खुनातील आरोपींचा माग काढण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागले. चार वेगवेगळ्या ठिकाणी खून झाल्याने एलसीबीच्या कर्मचाऱ्यांची ओढाताण झाली.
अनेकदा गाडीतच झोपावे लागते
ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार झाला आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींचा शोध तातडीने घेणे महत्त्वाचे असते. अशावेळी अनेकदा पोलिस अधिकारी-अंमलदारांना साप्ताहिक सुट्टीही घेता येत नाही. अनेकदा गाडीतच झोपावे लागते; आरोपीचा शोध हेच त्यावेळी प्राधान्य असते.
- संजय जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.