Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बडा चेहरा असलेले अजित पवार यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांसोबत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय आणि याला राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची साथ यामुळे अजित पवार व भाजपच्या हातमिळवणीकडे कॉँग्रेसकडून सावधगिरीने पाहिले जात होते.

या घटनाक्रमावर दुपारपर्यंत कॉँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, शरद पवार यांनी या प्रकाराला आपला पाठिंबा नसल्याने पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल्यानंतर, त्यातही तपास यंत्रणांच्या दबावामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते भाजपसोबत गेल्याकडे अंगुलीनिर्देश केल्यानंतर काँग्रेसकडून औपचारिक प्रतिक्रिया देण्यात आली.

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनच्या कारवाया सुरू झाल्याची खोचक प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली आहे. महाराष्ट्रातील भाजप आघाडीच्या सरकारमध्ये नव्याने दाखल झालेल्या चेहऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते.

ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर होते. आता या सर्वांना क्लिनचीट मिळाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

तर, कॉँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट करून मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्याची व त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती दिली.

भाजपचे डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट महाराष्ट्रात काम करत आहे. तेथील सरकार वैध मार्गाने निवडून आलेले नसून ईडीच्या पाठिंब्याने सत्ता काबीज करण्यात आली आहे.

गद्दार, भ्रष्टाचारी आणि तडजोड करणाऱ्या नेत्यांना लोकांनी ओळखले असून त्या सर्वांना पुढील निवडणुकीत धडा शिकविला जाईल, अशी तोफही वेणुगोपाल यांनी डागली.

दरम्यान, महाराष्ट्रातील घडामोडींमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची भीती काँग्रेसच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

शिवसेनेमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जोरावर महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपच्या जागा लक्षणीय प्रमाणात कमी करण्याचे उद्दिष्ट काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच ताकद विभाजित झाल्याने ते कितपत साध्य होईल, असा सवाल काँग्रेसमधून उपस्थित होतो आहे. १५ जुलैच्या आसपास बंगळूर येथे देशभरातील विरोधकांची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्रातील घटनाक्रमांचा विरोधकांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची चिंताही काँग्रेसला भेडसावते आहे. यासोबतच, महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा बडा विरोधी पक्ष बनला आहे.

त्यामुळे याचा पक्ष बळकटीसाठी राजकीय फायदा कसा घेता येईल याबाबतही काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू झाल्याचे कळते.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील फुटीसाठी ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केल्या आरोप सत्ताधारी भाजपवर काँग्रेसने केला असून कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या भूकंपाचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवासाठी जुळविलेल्या गणितावर होण्याच्या भीतीने कॉँग्रेसची चिंता वाढली आहे.

लोकांना गद्दारी आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांना योग्य जागा कळेल. फुटलेल्या प्रत्येकावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. घोटाळ्यांचे आरोप आहेत.

आपल्याला चांगली झोप यावी, या उद्देशाने त्यांनी पक्षांतर केले आहे. मोदी व भाजपविरोधात महाविकास आघाडी कायम आहे. जे सोबत आहेत, त्यांना बरोबर घेऊन आम्ही भाजपविरोधात लढा देणार आहोत,

— पृथ्वीराज चव्हाण, कऱ्डाडमधून बोलताना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT