Maharashtra Political Leaders: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज एकाच दिवशी साजरा होत आहे. दोघेही वेगवेगळ्या विचारसरणीचे असले तरी त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील साम्य आणि वैशिष्ट्ये यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. आजच्या या खास प्रसंगी जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिमत्त्व, कार्यशैली आणि राजकीय प्रवासाबद्दल.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सर्वात लक्षवेधी साम्य म्हणजे 2019 चा पहाटेचा शपथविधी. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना या दोघांनी राज्यपालांच्या साक्षीने हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र, अजित पवारांचे हे बंड फार काळ टिकले नाही आणि अवघ्या 82 तासांत सरकार कोसळले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वात कमी काळ मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड नोंदवला गेला. पण राजकीय नाट्य येथेच थांबले नाही. अडीच वर्षांनंतर अजित पवार पुन्हा बंडखोर झाले आणि सध्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय पार्श्वभूमीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. अजित पवार हे ग्रामीण भागातून आलेले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले नेते, तर देवेंद्र फडणवीस हे शहरी भागातील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले. याचा परिणाम त्यांच्या भाषणशैलीवरही दिसून येतो. अजित पवार यांची रांगडी, ग्रामीण लहेजा असलेली भाषा गावातील सामान्य माणसाचेही लक्ष वेधते. याउलट, फडणवीस यांची भाषा संयत, संयमित आणि प्रत्येक शब्द तोलूनमापून बोलणारी आहे, ज्यामुळे शहरी वर्गात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
दोघांच्या कार्यशैलीत काहीशी समानता आहे. अजित पवार यांच्या वक्तशीरपणाची आणि घड्याळाच्या ठोक्यावर काम करण्याच्या सवयीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. त्यांनी विकासकामांना पहाटेच्या वेळी भेटी देण्याची पद्धत रूढ केली आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून, प्रशासनावर घट्ट पकड ठेवणारे आणि चाणक्य नीतीने राजकीय डावपेच आखणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याची विरोधकांनी खिल्ली उडवली, पण महाविकास आघाडी सरकार पाडून दोन मोठ्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात त्यांनी यश मिळवले.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आपल्या शब्दाचे पक्के म्हणून ओळखले जातात. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पुरंदर मतदारसंघात विजय शिवतारे यांना पाडण्याचे सांगितले आणि ते खरे करून दाखवले. यामुळे त्यांचे विरोधकही त्यांना घाबरतात. फडणवीस यांनीही आपल्या राजकीय चातुर्याने अनेकदा विरोधकांना चकित केले आहे. विशेषतः, विधानपरिषद आणि लोकसभा निवडणुकांमधील त्यांचे डावपेच चर्चेचा विषय ठरले.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या कार्यशैलीने आणि अभ्यासू वृत्तीने महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या भिन्न भाषाशैली आणि कार्यपद्धती असल्या तरी दोघांचाही चाहतावर्ग प्रचंड आहे. वाढदिवसाच्या या खास प्रसंगी त्यांच्या योगदानाचा आणि राजकीय प्रवासाचा हा आढावा त्यांच्या चाहत्यांसाठी खास आहे. या दोन नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे, आणि यापुढेही ते चर्चेत राहतील यात शंका नाही.
नागपूर ते बारामती, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.