सोलापूर : विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता संपली असून आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले असून त्यात पाचव्यांदा निवडून आलेले एक, तिसऱ्यांना विजयी झालेले एक आणि दुसऱ्यांदा निवडून आलेले दोन आमदार आहेत. यापैकी तरुण नेतृत्व म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.
महायुतीतील सर्वच पक्षाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून शनिवारी (ता. १४) मुंबईत विस्तार शक्य आहे. नवीन मंत्र्यांच्या शपथविधीनंतर प्रत्येक पक्षाची बैठक होणार असून त्यानंतर अख्खे मंत्रिमंडळ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी रवाना होईल, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याला मागील पाच वर्षात महायुती असो की महाविकास आघाडी सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. तत्पूर्वी, २०१४च्या मंत्रिमंडळात दोन्ही देशमुख मंत्री होते.
आता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला निश्चितपणे किमान राज्यमंत्रीपद मिळेल, अशी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आशा आहे. सध्या आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख सोलापुरात असून कल्याणशेट्टी मुंबईत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात भाजपच्या पाच आमदारांपैकी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे तरूण आहेत, पण त्यांची पहिलीच टर्म असल्याने ते सध्यातरी मंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत. तर दोन्ही देशमुखांना यापूर्वी मंत्रिपदाची संधी मिळाली असल्याने सध्यातरी मंत्रिपदाच्या शर्यतीत कल्याणशेट्टीच असल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. त्यांनी सलग दोनदा काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला आहे. ते तरुण असून त्यांच्याकडे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्षपद आहे.
जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळावे म्हणून प्रदेशकडे मागणी
विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपला पाच जागांवर यश मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा तथा एक मंत्रिपद मिळावे, अशी मागणी प्रदेश कार्यालयाकडे केली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला मंत्रिपद मिळाले तर त्याचा सर्वांनाच आनंद होईल.
- नरेंद्र काळे, शहराध्यक्ष, सोलापूर
आमदारांचे कार्यकर्ते बांधताहेत अंदाज
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख सलग पाचव्यांदा आमदार झाले आहेत तर दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या दोघांनाही यापूर्वी २०१४मध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर पंढरपूर-मंगळवेढ्यातून समाधान आवताडे यांनी मागच्यावेळी पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता आणि आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले आहेत. या चारही आमदारांच्या कार्यकर्त्यांना आपल्याच नेत्याला मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी (ता. १४) होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्ते दररोज जिल्ह्यात कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, याचा अंदाज घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.