Lok Sabha Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election: शिवसेनेपुढे नमते घेऊन पुढे जाण्याचे काँग्रेसचे धोरण, जागावाटपाच्या तिढा सुटत नसल्याने घेतला निर्णय

Lok Sabha Election: बैठका आणि चर्चांमधून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या तिढा सुटत नसल्याचे जे चित्र निर्माण झाले होते, ते पुसून टाकण्याचा प्रयत्न आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुढे नमते घेऊन पुढे जाण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारल्याचे महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर स्पष्ट झाले आहे. सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांमधून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या तिढा सुटत नसल्याचे जे चित्र निर्माण झाले होते, ते पुसून टाकण्याचा प्रयत्न आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे.

सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होता. काँग्रेसच्या प्रबळ दावेदार असलेल्या या दोन जागांवर शिवसेनेने थेट उमेदवारच जाहीर केले होते. त्यासंदर्भात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी वारंवार चर्चा करून या जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. सांगलीच्या जागेसाठी माजी मंत्री विश्वजित कदम, संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. केंद्रीय नेतृत्वाने यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही, परिणामी हव्या असलेल्या दोन्हीपैकी एकाही जागेबाबत शिवसेनेने लवचिकता दाखवली नाही.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने १८, राष्ट्रवादी काँग्रेसने चार आणि काँग्रेसने एक जागा जिंकली होती. मात्र फुटीनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खासदार बाहेर गेले. काँग्रेसची आधी एकच जागा होती, असा दावा करताना शिवसेनेचेही १३ खासदार सोडून गेल्याचे वास्तव नजरेआड करण्यात आले. मात्र तिन्ही पक्षांपैकी काँग्रेसकडे आमदारांची संख्या अधिक आहे, परिणामी काँग्रसची स्थितीच राज्यात सर्वाधिक मजबूत आहे, असे असतानाही काँग्रेसला दुय्यम भूमिका घेणे भाग पडले.

केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या सबुरीच्या सल्ल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना एका मर्यादेपलीकडे आक्रमकता दाखवता आली नसल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीतील अनेक पक्ष ठिकठिकाणी काँग्रेसविरोधात लढत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस पक्ष तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरील हल्ले तीव्र केले जात आहेत.

अशा परिस्थितीत भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेणा-या एका पक्षाला सोबत ठेवण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले. ‘वीर सावरकर’ चित्रपटावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करणा-या देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली दौ-यात उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उत्तर दिल्याचे उदाहरण अगदी ताजे आहे. अशा परिस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला न दुखावण्याचे धोरण काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारले आहे, त्याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रातील जागा वाटपामध्ये सहन करावा लागल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची एरव्ही जागावाटपामध्ये महत्त्वाची भूमिका असते. कोणती जागा कुणाला आणि तेथील उमेदवार कोण असेल तर फायद्याचे ठरेल, याची गणिते पवारांच्या डोक्यात पक्की असतात.

अखेरच्या टप्प्यात ते सगळ्या गोष्टी दुरुस्त करीत असतात. परंतु यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाविकास आघाडीसाठी पुरेसा वेळ देता आला नसल्याचे दिसून येते. त्यांचा बराचसा वेळ प्रचाराबरोबरच पक्षाचे उमेदवार ठरवण्यासंदर्भातील बैठकांमध्ये गेला. बहुतांश काळ ते मुंबईबाहेरच असल्यामुळे त्यांना बारीकसारीक गोष्टींमध्ये लक्ष घालणे शक्य झाले नाही. त्यातूनही काही प्रश्न तसेच राहिले आणि तोडगा न निघताच ते एकतर्फी निकालात निघाले. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘सोशल इंजिनिअरिंग’ करण्यात आघाडी मागे

जागावाटपाच्या सुंदोपसुंदीत निवडणुकीसाठी आवश्यक असणारे सोशल इंजिनिअरिंग करण्यातही आघाडी मागे राहिली. प्रकाश आंबेडकर दुरावल्यानंतर त्यादृष्टीने आघाडीकडून प्रयत्न झाले नाहीत. जून २०२२ मध्ये राज्यसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही भाजपने व्यूहरचना करून आघाडीला पराभूत केले होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आलेल्या सर्वेक्षणांत महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र होते. जागावाटपात दाखवलेल्या ढिसाळपणामुळे ती परिस्थिती राहिली नसल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT