पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जवळपास नऊ महिने लॉकडाउन केले. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला असला तरी सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कारण, प्रत्येक वेळी लॉकडाउन करणे न परवडणारे आहे, असे मत अभिनय क्षेत्रातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी व्यक्त केले.
अजय नाईक, दिग्दर्शक
लॉकडाउनमुळे देशातील तीस टक्के सिंगल स्क्रिन बंद पडणार आहेत. त्यातच मराठी चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर फारशी मागणी नाही. अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. मात्र थिएटरच सुरू नाहीत. एका बाजूला नाटकांच्या प्रयोगांना परवानगी दिली जाते, मात्र चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे नवीन चित्रपटांसाठी गुंतवणूक करण्यास फायनान्सर हात आखडता घेत आहेत. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घ्यावा. कारण लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही.
रणजित गुगळे, निर्माता
लॉकडाउनमुळे अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. आता सर्व काही सुरळीत होत आहे; पण कोरोना रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे आम्ही चित्रीकरणावेळी सेटवर काळजी घेतो. प्रत्येकाची तपासणी होते. आता रुग्ण वाढले म्हणून लगेचच लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक नुकसान होईल.
शशांक केतकर, अभिनेता
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम कोणी करायचे आणि पाळायचे कोणी, याबाबत भिन्नता असल्याचे दिसते. राजकारण्यांच्या लग्न समारंभात हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. पोलिस मास्क घालत नाहीत, काही कलाकारही मास्क हनुवटीवरच ठेवतात. अनेक राजकारणीही मास्क घालत नाहीत, हे चित्र सर्वत्र दिसत असल्याने लोक त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत. नाहीतर लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्राजक्ता माळी, अभिनेत्री
गेल्या नऊ महिन्यांत काय काळजी घ्यायची, हे लॉकडॉउनमुळे लोकांना माहीत झाले आहे. मात्र काही लोक काळजी घेत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेले नियम पाळलेच पाहिजेत. आता लस आली असून, ती सर्वांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. त्यामुळे लॉकडाउनची भीती घालू नये.
भाग्यश्री देसाई, अभिनेत्री-निर्माती
रसिक मोहिनी संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी १२ मार्चला नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला. लॉकडाउनच्या काळात जवळपास ९ महिने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद होती. याचा कलाकारांसह बॅकस्टेज आर्टिस्टला मोठा फटका बसला. आता कुठेतरी नियमांचे पालन करून प्रयोग सुरू आहेत. नाटकांच्या प्रयोगांसाठी थिएटरला सवलत देणे गरजेचे आहे.
कलाकारांनी दिलेल्या टिप्स
लॉकडाउनमुळे झालेले नुकसान
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.