सोलापूर : शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. अनेकांना शेतजमीन नसते, पण शेतीची आवड असते. त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या शेती महामंडळाकडून शेतजमीन भाडे तत्त्वावर देण्यात येते. दरम्यान, सीलिंग कायद्यानुसार मोठ्या जमीनदारांच्या जमिनी सरकार जमा झाल्या. शेती सांभाळण्यासाठी स्वायत्त शेती महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ राज्य शासनाचा अंगीकृत असून, याद्वारे शेतकऱ्यांसोबत संयुक्त शेती केली जाते. सुरवातीला शेती महामंडळाकडून शेती केली जायची, पण ती तोट्यात जाऊ लागल्याने संयुक्त शेतीचा मार्ग अवलंबला. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या जमिनी भाड्याने घेण्याची सोय उपलब्ध झाली. सध्या महामंडळाकडे सुमारे १८ हजार एकर जमीन शिल्लक आहे.
जमीन भाड्याने घेण्यासाठी काय करावे?
शेती महामंडळाकडून सध्या ४१ हजार एकर शेतजमीन भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी साधारणतः: २३ हजार एकर शेतजमीन १० वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा १० वर्षांचा करार संपला आहे, अशी शेतजमीन पुन्हा महामंडळाकडून ताब्यात घेतली जाते आणि पुन्हा निविदा काढून जे शेतकरी जास्त भाडे देतील त्यांना भाडेकरारावर दिली जाते. सरकारच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर, महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागांतर्गत शेती भाड्याने देण्याच्या निविदा निघतात. निविदा निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्था, माती, रस्त्याची सोय, लाइटची सोय अशा गोष्टी तपासून निविदा भरणे आवश्यक आहे. निविदा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी अधिक माहितीसाठी शेती महामंडळाशी संपर्क करावा लागतो.
निविदेमध्ये शेतजमिनीची ‘ही’ माहिती असते
शेती भाड्याने देण्याच्या निविदेवर शेतजमिनीचा पत्ता, गट नंबर, नकाशा, पाण्याची सोय, रोड, जमिनीचा पोत, आसपास कोणती पिके घेतली जातात, अशा गोष्टींचा सामावेश असतो. त्याचबरोबर नकाशा आणि सातबारा सोबत जोडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा अंदाज येतो.
‘या’ घटकांना करता येता अर्ज
शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, बिगर शेतकरी शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्ज करू शकतात. शेती महामंडळाचे नियम व अटीही शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्जदारासंबंधी महामंडळाचे कोणतेही नियम नाहीत. पण, जमीन भाड्याने घेतल्यानंतर ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत महामंडळाला परत करावी लागते.
भाड्याने शेतजमीन घेतल्यावरच्या अटी
शेतात लागवड होणाऱ्या पिकासंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक असते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे पिके घेण्यास बंदी असते.
संबंधित जमिनीवर आपल्याला घर, बंगला, शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही. या जमिनीवर फक्त पिकांची लागवड करता येते.
कोणताही व्यवसाय, प्रक्रिया उद्योग करण्यास मनाई असते. संबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी असतात. शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारचे सुरक्षारक्षकही काम करतात त्यामुळे अतिक्रमण होत नाही.
जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे, बोअरवेल, विहीर खोदू शकतात. शेती पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळावे हा त्यामागील हेतू असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.