तात्या लांडगे
सोलापूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक, औषधनिर्माण व व्यवस्थापन शिक्षणाचा नवा अध्याय ठरली आहे. १९९८ साली डॉ. बी. पी. रोंगे यांनी स्थापन केलेल्या संस्थेने ‘पंढरपूर पॅटर्न’च्या माध्यमातून गावागावांतील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान- संशोधन व उच्च शिक्षणात नवा आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्ता, आदर व शिस्तीवर आधारित ज्ञानसंस्कृती, उत्कृष्ट निकाल, एनबीए, नॅक यांसारखी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मानांकने, मान्यताप्राप्त राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन, पेटंट्स, उत्कृष्ट प्लेसमेंट, विद्यार्थीपूरक उपक्रमांमुळे १९९८ साली पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेल्या ‘स्वेरी’ची ख्याती २७ वर्षांमध्ये देशभर पोचली आहे.
विद्यार्थीकेंद्रित शिक्षणावर भर, शिक्षकांचे अपडेशन, उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक, ॲकॅडमिक परफॉर्मन्स अशा पातळीवर पंढरपूर पॅटर्न तयार केला. त्यातून प्रोफेशनल एज्युकेशनवर भर राहिला आणि गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू लागले, असे ‘स्वेरी’चे वैशिष्ट्य आहे. महाविद्यालयात एमबीए व एमसीएची प्रवेश क्षमता प्रत्येकी ६० एवढी आहे. नॅक व एनबीए मानांकनप्राप्त या संस्थेचा ‘सीजीपीए’ ३.४६ इतका आहे. संस्थेत मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर (सीएससी), ई अँड टीसी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इजिनिअरिंग असे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
संस्थेने भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यातून ‘स्वेरी’ला प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्यासह प्रख्यात ६० ते ७० संशोधकांनी भेटी दिल्या आहेत. संस्थेच्या संशोधन परिषदेला अमेरिका, इंग्लंड, मलेशिया, ऑस्ट्रिया, इंडोनेशिया अशा देशांमधून संशोधक उपस्थित राहिले आहेत. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नीती आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ‘एनपीसीआयएल’ (तारापूर), आयआयटी अँड व्हीजेटीए, मुंबई अशा संस्थांनी देखील ‘स्वेरी’ला संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
संस्थापक डॉ. रोंगे यांनी स्वप्न पाहिले अन् आता...
आयआयटी मुंबईत शिकत असताना डॉ. बब्रुवान रोंगे यांच्या मनात गावातील तरुण- तरुणींसाठी काहीतरी करण्याचा विचार येऊन गेला. शिक्षण पूर्ण करून सोलापुरातील वालचंद इन्स्टिट्यूटमध्ये १९८६ साली नोकरी स्वीकारली. १९९४ मध्ये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सोलापुरातील एकमेव कॉलेज होते. त्यावेळी आपण स्वत: काहीतरी करण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ. रोंगे यांनी पहिले पाऊल पुढे टाकले. १९९५ साली संस्था स्थापन करून १९९६ साली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) प्रस्ताव सादर केला. १९९७ साली मान्यता मिळाली आणि १९९८ साली साडेबारा हजार स्क्वेअर फुटांच्या जागेत गोपाळपूर येथे पत्र्याचे शेड मारून त्या ठिकाणी अभियांत्रिकी कॉलेज सुरू केले. त्यावेळी १६० विद्यार्थी, आठ शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी सोबतीला होते.
आता ‘स्वेरी’ संस्थेच्या सात लाख स्क्वेअर फूट जागेत इमारती असून सध्या संस्थेत पाच हजार विद्यार्थी, २५० शिक्षक, २०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. २७ वर्षांमध्ये ‘स्वेरी’ संस्थेने पंढरपूर पॅटर्न जगभरात पोचविला असून, दरवर्षी संस्थेत प्रवेश हाऊसफुल्ल होतात. डॉ. रोंगे यांनी आता श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनअंतर्गत सीबीएसई पॅटर्नमधून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संधी देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याअंतर्गत बी.एस्सी. (ईसीएस), बीसीए या पदव्यांचे अभ्यासक्रम देखील आहेत. स्वेरीच्या कॅम्पसमध्ये मुला-मुलींच्या वसतीगृहाची देखील सोय आहे.
स्वेरीची वाटचाल गुणवत्ता व विश्वासार्हतेवर
‘स्वेरी’ संचलित महाविद्यालयांमधील रॅगिंगमुक्त व सुरक्षित शैक्षणिक परिसर पालकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. ‘स्वेरी’ने ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचे नंदनवन फुलवले आहे. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे महाविद्यालय ऑटोनॉमस झाले आहे. ‘स्वेरी’ने आता स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या माध्यमातून सोलापुरात देखील प्रवेश केला आहे. ‘स्वेरी’ची ही वाटचाल गुणवत्तेचे, विश्वासार्हतेचे प्रतीक आहे.
- डॉ. बब्रुवान रोंगे, संस्थापक, स्वेरी, पंढरपूर
‘स्वेरी’अंतर्गत महाविद्यालये
इंजिनिअरिंग (डिप्लोमा ते डिग्री)
फार्मसी (डिप्लोमा ते डिग्री)
व्यवस्थापन व संगणक शास्त्रामधील ‘एमबीए’ व ‘एमसीए’
स्वेरी लॉ कॉलेज
‘प्लेसमेंट’मधून वार्षिक ४१.५० लाखांचे पॅकेज
स्वेरी संस्थेतील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्लेसमेंटचे आयोजन केले जाते. दरवर्षी अभियांत्रिकीतील बहुतेक विद्यार्थ्यांना साडेचार ते दहा लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे. आतापर्यंत ४१.५० लाख रुपयांचे सर्वाधिक पॅकेज मिळाल्याचेही उदाहरण आहे. अनेक विद्यार्थी परदेशात देखील जॉब करीत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी देखील झाले आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणामुळे कमी होईल बेरोजगारी
केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सुरू केली आहे. आता पदवी व पदव्युत्तर शिक्षणात त्याची सुरुवात झाली असून, हे धोरण विद्यार्थ्यांच्या फायद्याचे आहे. त्याचा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. या धोरणामुळे बेरोजगारी कमी होईल, असा विश्वास आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, डिप्लोमा, बीसीए, एमसीए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तथा रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील, असेही डॉ. रोंगे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.