मुंबई - मुंबईतील केसी, एचआर, जय हिंद आदी महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी लाखो रुपयांचे व्यवहार केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केला. या महाविद्यालयांत चार, पाच लाख रुपयांत ऑफलाइन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर काही अनियमितता असल्याचे आढळल्यास चौकशी करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिले.
अल्पसंख्याक दर्जाच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबत धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी व अशा नामांकित महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातील फक्त ५ ते १० टक्के प्रवेश त्या त्या भाषिक अल्पसंख्याकातून करण्यात येतात. तर उर्वरित ४० ते ४५ टक्के जागा या प्रति विद्यार्थी ४ ते ५ लाख घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, असा आरोप मुंडे यांनी केला.
यावरील चर्चेला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री शेलार म्हणाले, की यावर ५० टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याचे अधिकार संबंधित महाविद्यालयास आहेत. अल्पसंख्याक कोट्यातील राखीव जागांमधून प्रवेश झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वेच्छेने सरेंडर करण्याची तरतूद आहे. त्यानुसार मुंबईतील जयहिंद, के.सी. आणि एच.आर. या महाविद्यालयांनी कोट्याच्या जागा स्वेच्छेने सरेंडर केल्याची माहिती शेलार यांनी दिली. यंदा एकही ऑफलाइन प्रवेश होणार नाही. शिवाय या प्रकाराची केस टू केस आढावा घेतला जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास चौकशी करणार असल्याची अशी ग्वाही आशिष शेलार यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.