सोलापूर : मुले अभ्यासच करत नाहीत, सतत मोबाईलवरच असतात, एका ठिकाणी फारवेळ अभ्यासाला बसत नाहीत, खूपवेळ अभ्यास करूनही त्यांच्या लक्षातच राहात नाही अशा बहुतेक पालकांच्या मुलांच्या बाबतीत तक्रारी असतात. पण, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ‘त्या मुलांसाठी चतु:सूत्री असून त्याचे पालन पालक व मुलांनी केल्यास निश्चितपणे मुलांची एकाग्रता व त्यांची बौद्धिक क्षमता देखील वाढेल.’
आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून आतापासूनच पालक मुलांकडे नीट अभ्यास कर, शाळेत, महाविद्यालयात एक नंबर आला पाहिजे अशी अपेक्षा करीत आहेत. त्या अपेक्षेच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या विद्यार्थ्याच्या अडचणी देखील समजून घेऊन पालकांनी त्याची मनाची एकाग्रता, आकलन व बौद्धिक क्षमता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणे जरुरी आहे. त्यासाठी त्याचा दररोजचा संतुलित आहार, झोप पुरेशी, घरातील वातावरण आनंदी ठेवणे असे उपाय करावेत. मोबाइलपासून त्याला दूर ठेवणे हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
अशी आहे चतु:सूत्री...
१) दररोजच्या जेवणात संतुलित आहार
विद्यार्थ्यांचा दररोजचा आहार संतुलित असावा. त्यात प्रोटिन व व्हिटॅमिन असणे जरुरी आहे. तूप, शेंगा, बदाम, कडधान्य विशेषत: मोड आलेले कडधान्य, गुळशेंगा लाडू, अंडी, फळे- भाजीपाला याचा आहारात समावेश असावा. विद्यार्थ्यांमध्ये ‘रक्ताल्पता’ची समस्या मोठी जाणवते. त्यामुळे त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही. अशावेळी गुळशेंगा लाडू दररोज दिल्यास निश्चितपणे ‘रक्ताल्पता’ कमी होण्यास मदत होते.
------------------------------------------------------------------------------------------
२) सात ते आठ तासांची पुरेशी झोप
विद्यार्थ्यांची दररोजची झोप किमान सात ते आठ तासांची असावी. रात्री दहा ते साडेदहापर्यंत झोपायलाच पाहिजे, असे नियोजन हवे. रात्री दहा ते सहा किंवा रात्री साडेदहा ते साडेसहा या वेळेत प्रत्येकजण झोपायलाच हवा. आयुर्वेदात ब्राह्मी मुहूर्ताला फार महत्त्व असून पहाटे पाच ते साडेपाच (सूर्योदयापूर्वी काही मिनिटे अगोदर) या वेळेत उठून केलेले काम किंवा अभ्यास कायमस्वरूपी लक्षात रहातो, असेही म्हटले जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------
३) पाठांतरापेक्षा विषय समजून घ्यावा
बहुतेक विद्यार्थी वार्षिक किंवा शाळा-महाविद्यालयाअंतर्गत परीक्षेवेळी पाठांतरावर जोर देतात. पण, घोकंपट्टी करून अभ्यास होत नाही. त्यासाठी अगोदर तो धडा किंवा संकल्पना- विषय नीटपणे समजायला हवा. त्यासाठी शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन जरुरी आहे. पाठांतरापेक्षा काही बाबींचे ज्ञान प्रात्यक्षिकातूनही देता येईल, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तो विषय सोप्या पद्धतीने समजेल. लहानपणापासून पालकांनी प्रत्येक गोष्टीत मुलांना सहभागी करून घेतल्यास त्याची आकलन क्षमता वाढण्यास मोठी मदत होते.
--------------------------------------------------------------------------------
४) ४५ मिनिटांनंतर घ्यावा दहा मिनिटांचा ब्रेक
प्रत्येकवेळी पाठांतर, लेखन करून जमत नाही. कधी कधी प्रात्यक्षिकातूनही ती कठीण संकल्पना, विषय समजून घेता येईल. दरम्यान, मानसोपचारतज्ज्ञांच्या मतानुसार आपला मेंदू एकाच ठिकाणी ४५ मिनिटांपेक्षा जास्तवेळ स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे एखादे काम करताना किंवा अभ्यास करताना प्रत्येक ४५ मिनिटांनी पाच-दहा मिनिटांची विश्रांती घेतल्याचा लाभ होतो. पण, अशावेळी अभ्यासाची आवड देखील महत्त्वाची ठरते.
मुलांकडे विशेष लक्ष द्यायला हवे
मुलांची एकाग्रता व आत्मसात करण्याची क्षमता वाढल्यास निश्चितपणे त्याला अभ्यासात कोणतीही अडचण येत नाही. त्यासाठी त्याला अगोदर ती कन्सेप्ट (संकल्पना किंवा विषय) समजायला हवा. ४५ मिनिटाच्या अंतरात दहा मिनिटांची विश्रांती घेता येईल. पुरेशी झोप, संतुलित आहार, योग, ध्यानधारणा याचाही मोठा फायदा होतो.
- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.