schools
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आता वर्षातून दोनदा ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) घेतली जात आहे. दुसरीकडे, आता जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती दरवर्षी पवित्र पोर्टलद्वारे होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील डबघाईला आलेल्या ‘डीएड’ महाविद्यालयांना पुन्हा ‘अच्छे दिन’ आले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या ‘डीएड’ला तर तरुणांचे प्रवेश अर्ज क्षमतेपेक्षा जास्त येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात २२ ‘डीएड’ महाविद्यालये असून, त्यात सहा महाविद्यालये अनुदानित आहेत. या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १६९० आहे. गतवर्षी या महाविद्यालयांमध्ये दीड हजारांवर तरुण-तरुणींनी प्रवेश घेतले आहेत. चार-पाच महाविद्यालये उमेदवार मिळत नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर होते, त्यांनी तसे प्रस्ताव देखील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे (डाएट) दिले होते. मागील १२ ते १५ वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २४ ‘डीएड’ महाविद्यालये प्रवेश न झाल्याने बंद पडली आहेत. मात्र, आता दरवर्षी दोनदा टीईटी व शिक्षक भरती नियमित होऊ लागल्याने चालू ‘डीएड’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश वाढले आहेत.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४९.५० टक्के तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ४५.५० टक्के गुणांवर ‘डीएड’ला प्रवेश मिळतो. पण, अर्जांची संख्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास गुणवत्ता यादी लावून प्रवेश दिले जातात. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. दरम्यान, अनुदानित महाविद्यालयांमध्ये तीन हजार रुपये आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १२ हजार रुपयांच्या शुल्कात ‘डीएड’ला प्रवेश दिला जातो, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ‘डीएड’ची स्थिती
एकूण महाविद्यालये
२२
अनुदानित महाविद्यालये
६
एकूण प्रवेश क्षमता
१६९०
सध्याचे एकूण प्रवेश
१५४०
‘टीईटी’साठी साडेपाच लाखांवर अर्ज
२१ जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर होणार आहे. त्याच दिवशी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुसरा पेपर होणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी पहिला पेपर आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी दुसरा पेपर असतो. ‘टीईटी’साठी अर्ज करण्याची मुदत २४ एप्रिलपर्यंत आहे. आतापर्यंत राज्यभरातून तब्बल साडेपाच लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात सध्या शाळांवर कार्यरत शिक्षकांचीही संख्या मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ३१ ऑगस्ट २०२७ पूर्वी ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. आता १५ जून २०२६ पूर्वी सुमारे १० हजार नवीन शिक्षकांची भरती देखील होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.