Rabi Crop Insurance
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा भरला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पाच लाखांवर शेतकरी आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विम्यातून आधार मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी ५०० कोटींचा हिस्सा भरला. सहा महिने झाले, अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही. आठ दिवसांत बाधित शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळेल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीकविम्याच्या निकषांनुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल, अशी स्थिती नसल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काही तालुके व त्यातील काही मंडळांमधील शेतकऱ्यांनाच नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा मिळेल, असेही ते म्हणाले. पीक कापणी प्रयोगानंतर अपेक्षित उत्पन्न व उंबरठा उत्पन्न, यातून झालेल्या नुकसनीची माहिती राज्य शासनाकडून केंद्र शासनाला पाठविण्यात आली आहे. त्याठिकाणी कोणत्या तालुक्यातील किती मंडळांमधील कोणत्या पिकांच्या उत्पन्नात घट झाली, त्यावर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम वितरीत होणार आहे.
एप्रिलमध्ये सन्मान निधीतून प्रत्येकी ६००० रुपये मिळणार
राज्यातील ९४ लाख शेतकरी सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असून त्यांना केंद्राकडून एक आणि राज्य सरकारकडून दोन हप्त्यांची प्रतीक्षा आहे. एप्रिलमध्ये त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये मिळू शकतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांची माहिती एकत्रित केली जात असून त्यातून पात्र-अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हप्त्यासाठी विलंब झाला आहे.
‘या’ पिकांसाठी पहिल्यांदा पीकविमा
खरीप हंगाम २०२५ च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात (धान), ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ आणि कांदा या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे. तूर व कापूस या पिकांचे पीक कापणी प्रयोग आणि त्याचा अहवाल अजूनही शासनाला गेलेला नाही. त्यामुळे या दोन पिकांचा विमा मिळायला एप्रिल महिना उजाडणार आहे. तत्पूर्वी, भात, ज्वारी, मका, बाजरी, मूग, सोयाबीन, उडीद, भुईमूग, तीळ व कांदा या पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
खरीप पीकविम्याची स्थिती
अर्जदार शेतकरी
९४ लाख
शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा
५०० कोटी
पीकविम्याची संरक्षित रक्कम
२,४०० कोटी
विमा संरक्षणाची पीके
१२
आठ-दहा दिवसांत मिळेल पीकविमा
राज्यातील सुमारे ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप २०२५ अंतर्गत पिकांचा विमा उतरविला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळेल. कापूस व तूर पिकांचा विमा काही दिवसांनी मिळेल, त्यासंबंधीची कार्यवाही सध्या सुरु आहे.
- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, नियोजन व प्रक्रिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.