महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ आणि हसं या प्रस्थापित राज्यसरकारनं करून ठेवलं आहे
अति सन्मानीय मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटक्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ आणि हसं या प्रस्थापित राज्यसरकारनं करून ठेवलं आहे, असा हल्लाबोल आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे.
ते म्हणाले, बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा, अशी वडेट्टीवरांची गत झाली आहे. ओबीसी, भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याच दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे माननीय वडेट्टीवार साहेबांच धोरण राहिले आहे. MPSC व UPSC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परिक्षा घेतली, यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार देत आहे. मात्र दुसरीकडे सारथी संस्था व बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देते.
पुढे ते म्हणाले, सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करत आहे. शिवाय सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केलं तर तीन दिवसांत निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली, तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत? म्हणजे महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? हे मंत्री वडेट्टीवार यांनी एकदा स्पष्ट करावं. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असा सवालही आमदार पडळकर यांनी केला आहे.