सोलापूर : जिल्ह्यातील अंदाजे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी अवघे दोन लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात आले आहे. अजूनही पाच लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन झालेले नाही. दर चार वर्षांनी एकदा तरी दुष्काळाचा सामना करावा लागतोच, अशावेळी ठिबक तथा सूक्ष्म सिंचन हाच दुष्काळावरील कायमचा उपाय असल्याचा विश्वास जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये व्यक्त केला आहे.
जिल्ह्यासाठी वरदान असलेले भीमा नदीवरील उजनी धरण होऊनही पाऊस कमी पडतो तेव्हा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असून ४० हून अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. उसामुळे पाण्याची गरज वाढली असून धरणातून कॅनॉलद्वारे दोन-तीन आवर्तने सोडल्यावरच पिकांची तहान भागते. पण, शेतकऱ्यांनी आता ठिबक सिंचन करणे काळाची गरज असून जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र देखील ९५ हजार हेक्टरवर पोचले आहे. उजनी धरणातील गाळ अजून निघालेला नाही, दुसरीकडे दुष्काळामुळे जमिनीखालील पाणीपातळी देखील खालावली आहे. अशावेळी सूक्ष्म सिंचनच दुष्काळावरील शाश्वत उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वांनी पाणी जपून वापरावे लागेल
सोलापूर जिल्ह्यात ज्या सिंचनाच्या योजना सुरू आहेत, त्या वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्र वाढेल. सूक्ष्म सिंचन काळाची गरज असून सर्वांनी पाणी जपून वापरावे लागेल. त्याशिवाय दुष्काळावर कायमचा उपाय अशक्य आहे.
- सुरेश सोडल, निवृत्त सचिव, जलसंपदा
---------------------------------------------------------------------------
सूक्ष्म सिंचन काळाची गरज
भीमा नदीवरील प्रस्तावित बॅरेजची कामे लवकर व्हावीत, बॅरेजमध्ये पाणी सोडल्यास त्या त्या भागातील टंचाई कमी होण्यास मदत होईल. बंधाऱ्यांवरील पाणी वापर परवान्याचे वेळोवेळी नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचन काळाची गरज आहे.
- अरुण कांबळे, निवृत्त कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ
------------------------------------------------------------------------------
धरणातील गाळ व वाळू काढल्यास होतील सर्व कामे
बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर झाल्यास पावसाचे पाणी त्याठिकाणी अडविणे सोयीचे होईल. नदीतून पाणी सोडण्याची तरतूद उजनी प्रकल्पात नाही. दरम्यान, धरणातील गाळ व वाळू काढल्यास त्यातून मिळणाऱ्या महसूलातून कॅनॉलसह कालव्यांच्या दुरुस्तीला निधी मिळेल आणि पाण्याची गळती बंद होईल.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
--------------------------------------------------------------------------------
चार वर्षांतून एकदा तरी दुष्काळ पडतोच
शिरापूर, एकरूख उपसा सिंचन योजनांची कामे जूनअखेर पूर्ण होतील. बार्शी, आष्टी, देगाव उपसा सिंचन योजनेचीही कामे लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चार वर्षांतून एकदा तरी दुष्काळ पडतोच, अशी स्थिती आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचन हाच त्यावरील हमखास उपाय आहे.
- ज्ञानदेव बागडे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.