solapur-latur road crime
sakal
लातूर/सोलापूर : समोरून येणाऱ्या कारने कट मारला, त्याची एवढी हिंमत का? असे म्हणून आपली गाडी माघारी फिरवून चौघांनी अनमोल केवटे यांची गाडी अडवली. त्यावेळी जीपमधील चौघे कोण आहेत, याची कल्पना नसलेल्या अनमोलने त्यांच्याशी वादावादी केली. त्यावेळी नशेतील दोघे गाडीतून उतरले आणि अनमोलला शिवीगाळ सुरू केली. एकाने अनमोलला धरले आणि विष्णू मामडगे याने अनमोलच्या गळ्यावर, छातीवर वार केले. भांडण सोडवायला आलेल्या सोनाली भोसले यांच्यावरही वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर चौघे पसार झाले. यात अनमोल अनिल केवटेचा (वय ३४, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) मृत्यू झाला असून सोनालीवर उपचार सुरू आहेत.
लातूर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यक्रम आटोपून अनमोल केवटे व त्यांची मैत्रीण सोनाली भोसले (वय ४०, रा. अंत्रोळी) हे कारने बुधवारी (ता. १७) रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लातूर परिसरातील रिंगरोडवरील लहुजी साळवे चौकात केवटे यांच्या गाडीचा एका जीपला कट बसला. त्यानंतर जीपमधील तरुणांनी कारचा पाठलाग केला आणि गाडी आडवी लावून कार थांबविली. त्यावेळी झालेल्या वादात जीपमधील विष्णू मामडगे याने त्याच्याजवळील चाकूने अनमोलच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर वार केले. मित्राला मारत असल्याने मदतीसाठी सोनाली धावल्या, पण त्यांच्यावरही विष्णूने दोन वार केले. त्यांच्यावर लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्या शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
तत्पूर्वी, केवटे यांचा कारचालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे यांच्या फिर्यादीवरून मारेकऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी शुभम जयपाल पतंगे (वय २४, रा. संजयनगर, बसस्थानकासमोर, रेणापूर) याला अटक केली. न्यायालयाने शुक्रवारी (ता. १९) त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील वैभव स्वामी (रा. रेणापूर) यालाही अटक केली आहे. पण, गुन्ह्यातील मुख्य दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.
घातपात नव्हे कट मारल्याच्या रागातूनच खून
कार चालकाने आपल्या गाडीला कट मारला, यावरून झालेल्या भांडणात संशयित आरोपी विष्णू मामडगे याने अनमोल केवटे व सोनाली भोसले यांच्यावर धारदार चाकूने वार केले. त्यातच अनमोलचा मृत्यू झाला असून यात घातपाताचा प्रकार नाही. जीपमधील चौघेही रेणापूर तालुक्यातील असल्याचे शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
मुख्य संशयित सराईत गुन्हेगार
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेली जीप रेणापूर तालुक्यातील एका गावात पोलिसांना आढळली. रस्त्यावरच जीप सोडून अन्य संशयितांनी पलायन केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित विष्णू मामडगे याच्याविरूद्ध पूर्वी खूनाचा प्रयत्न, हाणामारी, दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.